Friday, February 27, 2009

आपण सही तरी मराठीत करतो का?

मराठी भाषा मरू घातली आहे, असं एक विधान इतिहासाचार्य राजवाड्यांनी केलं होतं. त्यावरून बराच काळ खल होत राहिला. नंतर मराठी भाषेवरून बरेच "राडे' होत राहिले आहेत. या ना त्या रूपात मराठी भाषेच्या अस्तित्वाची चर्चा होते आहे.आपण चर्चेत हिरिरीनं भाग घेतो. उत्तर भारतीयांच्या नावानं बोटं मोडतो; पण आपली मुलं मराठी शाळेत जात नसतात. त्यांना इंग्लिश मीडियममध्ये घालायलाही हरकत नाही. आपलं मूल जगाच्या व्यवहारात कुठंही कमी पडू नये, याची काळजी पालक म्हणून घ्यायला हवीच. त्यासाठी आवश्‍यक ते करायलाही हवं. पण ते करताना "आपल्या' भाषेसाठी आपण काय करतो? इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या मुलांना "ट्‌विंकल-ट्‌विंकल लिट्‌ल स्टार' बरोबरच मराठी कविता शिकवतो का? आई-वडिलांनी आपल्याला इंग्लिश मीडियममध्ये घातलं नाही... नाही तर आज आपण कुठल्या कुठे गेलो असतो, असं म्हणत आपण कितीदा मराठीच्या नावानं बोटं बोडलेली असतात?रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये समोरच्या माणसाने इंग्रजीत विचारलेल्या प्रश्‍नाला तेवढ्याच सफाईदार इंग्रजीत उत्तर देता येत नाही म्हणून आपण किती कानकोंडले होतो? फ्रेंच माणूस फ्रान्समध्ये, जर्मन माणूस जर्मनीमध्ये त्याची भाषा सोडून दुसरी भाषा येत नाही म्हणून असा ओशाळत असेल? पण समोरच्या माणसाला मराठी समजत नसेलच असं गृहीत धरून हिंदीत बोलायला सुरुवात करतो. असं बंगालमध्ये घडेल? तमिळनाडूत घडेल? ते जाऊ द्या. तुम्ही वर्षभरात किती मराठी पुस्तकं वाचता? किती मराठी पुस्तकं विकत घेता? तुम्ही एखाद्या मराठी लायब्ररीचे सभासद आहात का? तुम्ही थिएटरमध्ये जाऊन मराठी सिनेमा बघता? तुम्ही सही करता मराठीत?आपण यातल्या कित्येक गोष्टी करीत नसतो. आपल्या भाषेचा विचार आपण आपली अस्मिता म्हणून करीत नाही. राजकारणी त्यांच्या राजकारणासाठी अस्मितेचे अंगार फुलवायला बघतात तेव्हा आपण मराठीच्या रक्षणासाठी कुणीतरी उभं ठाकलं म्हणून समाधान पावतो. पण आपल्या जबाबदारीचं काय?भाषा जशी एकाएकी निर्माण होत नाही, तशी ती एकाएकी संपतही नाही. ती भाषा बोलणारी माणसंच तिला घडत-बिघडवत असतात. एरवी भाषा ही अखंडपणे सुरू असलेली प्रक्रया असते. ही प्रक्रया विलक्षण चैतन्यशील असते. ती समाज घडवते, संस्कृती घडवते. तो समाज आणि त्याची संस्कृतीही त्या भाषेला घडवत असतात. भाषा ही त्या समाजाची आयडेंटिटी असते आणि समाज हे त्या भाषेचं दृश्‍य रूप असतं.घडली ती ज्ञानेश्‍वर, तुकाराम अशा संतांच्या अंगाखांद्यावर. त्यांनी तिला भक्तिरसात डुंबवलं. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन दिला. सामाजिक भान दिलं. त्यांच्या संस्कारांनी मराठी घडत गेली. तिनं आक्रमकांचे शब्द घेतले, पचवले, रिचवले. इंग्रजीनं जगाची खिडकी उघडली तेव्हा ते वारंही घरात घेतलं. आज "मराठी मागे पडते आहे' ही भावना आहे, तिचं मूळ आहे आपल्यातच. आपल्या भाषेचा आपल्यालाच न्यूनगंड आहे. निधडेपणानं आपण मातृभाषा स्वीकारू, तिला प्रतष्ठा देऊ तेव्हा ती प्रतष्ठित बनेल. पूर्वप्रसिध्दी, मुंबई सकाळ, 21 फेब्रुवारी

1 comment: