Wednesday, February 4, 2009

मीडिया खरोखरच दहशतवादी आहे का?

मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याला दोन महिने पूर्ण झाले आहेत. पहिल्या महिनाभरातला प्रतिक्रियात्मक भर ओसरून आता अधिक शांतपणे त्या सगळ्या घटनेचं विश्‍लेषण सुरू आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. जगातलं एक महत्त्वाचं शहर. तेव्हा त्याच्या सुरक्षेसाठी जास्त सजग राहिलं पाहिजे या भूमिकेतून आता आत्मपरीक्षण सुरू आहे. सागरी सुरक्षा, पोलिस यंत्रणा, दळणवळण यंत्रणा, संपर्क-संवाद यंत्रणा या सगळ्या यंत्रणा त्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत.26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत इलेक्‍ट्रॉनिक मीडिया अर्थात न्यूज चॅनेल्सवर सगळ्यात जास्त टीका झाली. या घटनेदरम्यानचं मीडियाचं वागणं अत्यंत आक्रस्ताळी, खरं तर दहशतवादीचं होतं आणि असं वागणाऱ्या मीडियावर काही तरी नियंत्रण हवं असा सूर त्यानंतर निघत राहिला. इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीडियासाठी आचारसंहिता असावी, हा त्यातूनच पुढे आलेला मुद्दा. म्हणूनच हा मीडिया खरोखरच दहशतवादी आहे का, ही चर्चा होणं आवश्‍यक आहे.प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया आणि न्यू मीडिया म्हणजे इंटरनेट ही आजच्या काळातली तीन मुख्य माध्यमं आहेत. हे तीनही मासमिडिया आहेत. म्हणजेच ते एकाच वेळी अनेकांशी संवाद साधतात. एकाच वेळी अनेकांवर प्रभाव निर्माण करणारी ही आधुनिक माध्यमे आहेत.त्यातही प्रिंट मीडिया म्हणजे मुख्यतः वर्तमानपत्र. त्यांना दीडशे वर्षांची परंपरा आहे. स्वातंत्र्यलढ्यासारख्या भव्यपटाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची सुरुवात झाली. त्यामुळे प्रिंट मीडियाला आपोआपच एक ओजाची परंपरा मिळाली. मराठीपुरतं बघितलं तरी टिळक-आगरकर-परांजपे अशा दिग्गजांनी एकेकट्याच्या बळावर सुरू केलेली, पेलून दाखवलेली त्या काळातली नियतकालिकं त्या त्या व्यक्तींच्या अस्तित्वामुळे, त्यांच्या व्यासंगामुळे व्यापक भान असणारी, सामाजिक उत्तरदायित्व मानणारी होती. ती त्या काळाचं प्रॉडक्‍टही होती. एकेका माणसानं वर्तमानपत्रं सुरू करून चालवणं, त्याला असलेलं जबाबदारीचं भान वैयक्तिक नफ्यापेक्षाही सामाजिक जाणीव महत्त्वाची (त्यापेक्षाही वैयक्तिक नफ्याचं भानच नसणं) ही भावना या सगळ्यांमुळे प्रिंट मीडिया आपोआपच जबाबदार होत गेला. त्या काळातल्या प्रिंटिंग टेक्‍नॉलॉजीमुळे खपाच्या मर्यादा, साक्षरतेचं तुलनेत कमी प्रमाण या सगळ्यांमुळे त्याला चुका करायला, शिकायला, प्रयोग करायला वावही मिळाला. यामधूनही तो घडत गेला. हे माध्यमच मूळतः नवीन, धकाधकीच्या काळात तयार होत गेलेलं. त्यामुळे त्याची इतर कुठल्याही माध्यमाशी तुलनाही होऊ शकत नव्हती. तुलना करण्यासाठी म्हणून दुसरं माध्यमही उपलब्ध नव्हतं.त्या तुलनेत टीव्ही मीडिया पाहिली तर काय दिसतं? आपल्याकडे या मीडियाचं वयच मुळात जेमतेम 15 ते 20 वर्षांचं आहे. संपादकापासून सगळेच जण या माध्यमात अनुभव घेत, प्रयोग करीत, शिकत, घडत असलेले. त्याची सतत तुलना होणार ती दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या प्रिंट मीडियाशी. हे माध्यम पूर्णपणे टेक्‍नॉलॉजीवर अवलंबून असलेलं. 1991 च्या आर्थिक उदारीकरणानंतर या तांत्रिक बदलांनी वेग घेतला. तिकडे प्रिंट मीडियात शब्द हे माध्यम तर इथं दृश्‍य हे माध्यम महत्त्वाचं. त्यात हळूहळू अपारहार्यपणे 24 तास चालणारी चॅनेल्स सुरू झाली. अगदी तरुण असलेलं हे माध्यम सुरुवातीपासूनच सातत्यानं टीकेला बली पडतं आहे. कामाची एनर्जी ही या माध्यमाची गरज असल्यामुळे इथं काम करणारे तरुण पत्रकार, 24 तासांची मर्यादा असल्यामुळे घड्याळ्याच्या काट्याशी करावी लागणारी स्पर्धा, ब्रेर्किंग न्यूजचं सततचं दडपण, टेक्‍नॉलॉजी हे सामर्थ्य अशी सगळी या माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत.पण त्याच त्याच्या मर्यादाही आहेत.इथं काम करणाऱ्या सीनियर मंडळींचं सरासरी वय 30 ते 40 आहे, तर ज्युनियर मंडळींचे वय 20 ते 25. साधारण 2 ते 3 वर्षं हा इथला "बर्नआऊट रेट' आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एवढा काळ काम केल्यानंतर त्या माणसाला त्या कामातून बाहेर पडावसं वाटतं. त्याची एनर्जी संपून जाते. या काळात त्यानं रोज 15-16 तास काम केलेलं असतं. त्याचं वैयक्तिक जगणं जणू संपून गेलेलं असतं. प्रचंड गतिमानता ही या माध्यमाची गरज असल्यामुळे सतत नवनवीन गोष्टींच्या मागे असणं, सगळ्यांच्या आधी आपणच बातम्या ब्रेक करणं यामागे टीव्ही पत्रकार असतात. आज त्यांच्या हातून घडताहेत त्या सगळ्या चुका प्रचंड स्पर्धेतून आलेल्या ब्रेकिंग न्यूजच्या दडपणातून घडताहेत.मुख्य म्हणजे हे दडपण दोन्ही बाजूंनी आहे. समजा सगळ्या चॅनेल्सवर पंतप्रधानांच्या बायपासची बातमी दाखवली जात आहे आणि एखादं चॅनेल ती बातमी वाढवायची नाही असा जाणीवपूर्वक निर्णय घेऊन थोडक्‍यात तपशील सांगून दुसरीकडं वळलं तर बघणारे "बाकी सगळे ती बातमी दाखवत असताना हे झोपले होते' असं म्हणू शकतात. त्याचा त्या चॅनेलच्या इमेजवर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम पुढे जाहिरातींवर होतो. कोण अशा रीतीनं जाणीवपूर्वक आपल्या पायावर धोंडा मारून घेईल? त्यापेक्षा सगळ्यांबरोबर, नव्हे सगळ्यांच्या पुढे राहण्यासाठी कोणतीही घटना घडली की तिच्यातले वेगवेगळे अँगल्स बाहेर काढण्यात आपण कसे "सबसे तेज' आहोत हे सिद्ध करीत राहा, हाच पर्याय उरतो.हे सगळं 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यात अधिक ठळकपणे पुढे आलं. न्यूज चॅनेल्सनी अतिउत्साहाचाही अतिरेक केला, आततायीपणा केला असे आक्षेप घेणारे हे विसरतात की, वृत्तवाहिन्यांमुळेच जे घडलं ते तातडीनं जगासमोर आलं, हल्ल्याची तीव्रता समजली. न्यूज चॅनेल्स एनएसजी कमांडो नरिमन हाऊसवर उतरत असतानाचं जे फुटेज दाखवत होती, ते बघून अतिरेकी आपली धोरणं उठवत होते, असं म्हणणं अगदीच हास्यास्पद आहे. 26 नोव्हेंबरची घटना घटल्यानंतर अत्यंत उत्तेजित होऊन, अत्यंत आक्रमकपणे वृत्तवाहिन्यांनी काम केलं ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे एकच घटना, एखादी बातमी वेगवेगळ्या चॅनेल्सवर वेगवेगळ्या अँगल्सनी येत होती. तिचा विपर्यास होत होता हेही खरं; पण या जशा न्यूज चॅनेल्सच्या चुका होत्या तशा सरकारकडूनही होत्या. इराकमध्ये गेली पाच वर्षे काम करणारे जय देशमुख हे एएफपीचे युद्ध वार्ताहर सांगतात की, अशा घटना घडतात तेव्हा विकसित देशांमध्ये दर तासा-दोन तासांनी सरकारकडून अधिकृत माहिती दिली जाते. आपल्याकडे अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. तशी व्यवस्था असती तर अधिकृत माहिताचा आधार न्यूज चॅनेल्सना घ्यावाच लागला असता, याचा जाब सरकारला कोण विचारणार?ताज आणि ओबेरॉयमध्ये तीन दिवस एनएसजीची ऑपरेशन्स सुरू होती. या काळात हा सगळा परिसर बघ्यांनी भरून गेला होता. पिकनिकला यावं तशी लोक मुलाबाळांना घेऊन एनएसजीची ऑपरेशन्स बघायला येत होते. मोबाईलवर फोटो काढत होते. ही गर्दी आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ येत होते.अशा ठिकाणी जाऊन गर्दी करू नये, यंत्रणेवर ताण आणू नये, अशी संवेदनशीलता लोकांनी दाखवली नाही आणि हे लोक वर्तमानपत्रात पत्र लिहून न्यूज चॅनल्स कशी बेजबाबदार आहेत, याचा धोशा लावत होते. त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीचं काय? जबाबदारी, संवेदनशीलता फक्त मीडियानेच दाखवायची असते का?दुसऱ्या दिवशी लगोलग घटनास्थळाला भेट देऊन गुजरातचे नरेंद्र मोदी यांनी राजकीय भाषणं ठोकली. मदत जाहीर केली. त्याला जबाबदारीचं भान म्हणायचं का? मुंढे यांच्यासारख्या इतरही भाजप नेत्यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या, राजकीय भाषणं केली. ही राजकारण करायची जागा नाही आणि वेळही नाही याचं भान त्यांनी तरी कुठं ठेवलं? ताजची पाहणी करण्यासाठी रामगोपाल वर्माला घेऊन जाणं, महत्त्वाच्या घटनेत शिथिल बोलणं याची किंमत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मोजावी लागली; पण इतरांचं काय?याचा अर्थ इतरांच्या चुका दाखवायच्या आणि मीडियाच्या झाकायच्या असा नाही. मीडियाकडूनह चुका झाल्या. इतक्‍या तीव्रतेचा हा हल्ला ही इतकी अनपेक्षित गोष्ट होती की ती हाताळायची कशी, हे सगळ नेमकं किती दिवस चालणार, याचा अंदाजच नसल्यामुळे सगळी व्यवस्थाच गडबडलेली होती. अशा वेळी आक्षेप मात्र घेतले गेले ते एकट्या मीडियावरच. मीडियानं सलग तीन दिवस जीव धोक्‍यात घालून कामही केलं.एरवीही काही अपवाद वगळता हा मीडिया जबाबदारीनं काम करताना दिसतो. देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातल्या गावातला प्रिन्ससारखा अगदी सामान्य मुलगा बोअरवेलमध्ये पडण्यासारखी घटना असो, चांद्रयान मोहीम असो, ग्रहण असो की अगदी पंतप्रधानांची बायपास सर्जरी. ती ती निमित्त पकडून दक्षिणोत्तर, पूर्व पश्‍चिम पसरलेल्या अंधश्रद्धा, अज्ञान, निरक्षरता यांचा प्रभाव असलेल्या आपल्या देशात लोकशिक्षण करणं ही सोपी गोष्ट नाही. पंतप्रधानांच्या बायपास सर्जरीचं निमित्त साधून गेल्या आठवड्यात बायपास सर्जरीची माहिती या पद्धतीनं न्यूज चॅनेल्सवरून दिली गेली ती यासाठी महत्त्वाची होती का आपल्या समाजाचा ज्ञानापेक्षाही मनोरंजनावर जास्त भर आहे? वाचकांपेक्षा प्रेक्षकांचं "मानसिक वय', "प्रगल्भता' नेहमीच कमी असते, त्याला वेगवेगळी निमित्त पकडून मनोरंजनाकडून माहितीकडे, ज्ञानाकडे वळवण्याचं महत्त्वाचं काम मीडिया करतो. आपण चुकांबद्दल फटकारे ओढतो तेव्हा या विधायक गोष्टींबद्दल बोलतो का?26 नोव्हेंबर घ्यानंतर तर मीडियाचा अतिउत्साह अतिरेकी होता, हेच जणू दहशतवादी आहेत अशा चर्चा रंगल्या; पण अशा चर्चा करणारे ना कधी मीडियाच्या कामाच्या पद्धती समजून घेतात, ना त्यांच्या अडचणी. आपल्यासमोर घडत असलेल्या या मीडियाला आपण परिपक्व होण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे.

No comments:

Post a Comment