Wednesday, February 4, 2009

मॅच्युरिटीची प्रक्रिया

जेव्हा काही घडत नसतं, तेव्हा लोक आपापल्या सोयीनुसार बातम्या बघतात; पण जेव्हा खरोखरीची ब्रेकिंग न्यूज येते, तेव्हा न्यूज चॅनेल्सचा "टीआरपी'वर जातो. याचा अर्थ त्या क्षणी मनोरंजन सोडून बातम्या बघण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. हे सगळं आपल्यापर्यंत आणणाऱ्या न्यूज चॅनेल्सचं भारतातलं वय आहे जेमतेम 15 ते 20 वर्षांचं. या क्षेत्रात सगळ्या आघाड्या सांभाळणाऱ्यांचं वय सरासरी 35 वर्ष. प्रचंड वेळ घेणाऱ्या या क्षेत्राचा बर्नआऊट रेट दोन वर्षं. म्हणजे दोन वर्षं इथं कोणताही माणूस न कंटाळता, आनंदानं काम करतो. प्रचंड ऊर्जा असलेल्या थोड्या लोकांचा अपवाद वगळता फ्रंट आघाडी सांभाळणारी माणसं दोन वर्षांत बाजूला होतात, नवी तरुण माणसं समोर येतात, कारण- कामासाठी लागणारी ऊर्जा ही या माध्यमाची महत्त्वाची गरज असते. त्यामुळे आपल्याला तिथं सतत नवी तरुण माणसं येताना-जाताना दिसतात. त्याबरोबरच नाट्यमयता, आक्रमकता याही या माध्यमाच्या गरजा आहेत. त्यामुळे तशाच प्रकारची माणसं आपल्याला तिथं दिसतात. न्यूज चॅनेल्सवर जे आक्षेप घेतले जातात, त्या प्रकारच्या चुका याच मंडळींकडून होताना दिसतात. जसजसं हे माध्यम जुनं होत जाईल, तसतशा या चुका कमी होत जातील आणि हे माध्यम परिपक्‍व होत जाईल. मुख्य म्हणजे ही सगळी प्रक्रिया आपल्या सगळ्यांसमोरच घडणार आहे. कारण- कॅमेरा काहीच लपवत नाही; लपवू शकत नाही.

No comments:

Post a Comment