Sunday, May 31, 2009

रेखाचा गुस्सा!

"रा ज कपूर जीवनगौरव' पुरस्कार जाहीर झाल्यावर आपल्या रेखाताईंनी एक वक्तव्य काय केलं; सगळा गहजब उडाला."जीवनगौरव' या नावाला रेखाताई वैतागल्या म्हणे.त्यांना असं वाटलं, की जीवनगौरव पुरस्कार देताहेत म्हणजे आपल्याला आता काम थांबवा आणि घरी निवांत बसा, असंच अप्रत्यक्षपणे सांगितलं जातंय. म्हणजे थोडक्‍यात आता रिटायर व्हा, असा सल्ला आपल्याला दिला जातोय असा अर्थ लावला रेखाताईंनी आणि जाम तडतड केली. सरकारनंही काय घोटाळा झाला, हे लक्षात आल्यावर चक्क पुरस्काराचं नावच बदलून टाकलं आणि "राज कपूर जीवनगौरव'ऐवजी "राज कपूर प्रतिभागौरव' पुरस्कार रेखाला दिला जाईल, असं जाहीर केलं.इथपर्यंत सगळं नीट चाललं होतं. आता काय पुरस्कार देण्याचाच तेवढा उपचार.पण मामला वाढतच गेला. कुणी एक धमाल विनोदी वक्तव्य केलं, की सरकार एका बाईपुढे नमलं. कुणी म्हणालं, सरकारनं असं काहीतरी करणं हे अजिबातच चुकीचं आहे. सरकारनं असं पुरस्काराचं नाव काय म्हणून बदलावं वगैरे वगैरे.आपल्या एका स्त्रीहट्टामुळे काय काय झालं याची तिकडे आपल्या रेखाताईंना कल्पनाच नाही. कशी असेल म्हणा? एक-एक पुरस्कार मिळविण्यासाठी काय काय करावं लागतं, त्यांना काय माहीत?कोण स्वतः मोठं होण्यासाठी दुसऱ्यांना पुरस्कार देत असतात. कोण मोठं होण्यासाठी पुरस्कार अगदी प्रयत्नपूर्वक मिळवीत असतात. काही वेळा पुरस्कार ठरवून दिले जातात; तर काही वेळा ते खिरापतीसारखे वाटले जातात म्हणे! काही वेळा पुरस्कार घेणाऱ्यांना तुम्ही आम्हाला "धन' द्या; आम्ही तुम्हाला पुरस्काररूपी "मान' मिळवून देऊ, असंही सांगितलं जातं म्हणे!मुंबईत काम करणाऱ्या एका पत्रकार महोदयांना आलेला पुरस्काराबाबतचा अनुभव अगदी सांगण्यासारखा आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांना "परभणी भूषण' पुरस्कार देण्याचा प्रस्ताव थेट परभणीहून आला. आपली थेट परभणीपर्यंत पसरलेली लोकप्रियता बघून त्यांना अगदी भरून आलं. पुरस्कार घ्यायला त्यांना जायला जमलं नाही; पण पुढच्याच महिन्यात कामासाठी गेल्यावर त्यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधला. तेव्हा त्या कार्यक्रमात असे तीसेक जण "परभणी भूषण' झाले होते. त्यातले काही वेगवेगळ्या शहरांमधले पत्रकार होते. हा धक्का कमी होता म्हणून की काय, पुरस्काराचं स्मृतिचिन्हही त्यांना दिलं नाही. कारण काय; तर तुम्हाला आम्ही एवढा पुरस्कार जाहीर केला; पण तुम्ही आमची बातमी कुठे जाहीर केली तुमच्या पेपरात?त्याच वर्षी सुरू झालेल्या त्या गल्लीतल्या संस्थेला आपल्या त्याच वर्षी सुरू झालेल्या पुरस्कारांची बातमी राज्यभरात छापून आणायची होती. त्यासाठी त्यांनी राज्यभरातल्या वेगवेगळ्या पत्रकारांनाच पुरस्कार द्यायची शक्कल लढविली होती. ही तर पुरस्काराची एक साधी कहाणी. पुरस्कारांच्या अशा किती रम्य आणि सुरस कहाण्या सांगाव्यात?अर्थात याचा अर्थ असा नाही, की पुरस्कारांच्या दुनियेत प्रामाणिकपणे काही घडतच नाही!खरोखर चांगलं काम करणारी माणसं आणि खरोखर योग्य माणसांना पुरस्कार देणाऱ्या संस्था आहेतच की!पण ही सगळी मंडळी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच.अभिनयाच्या क्षेत्रात रेखाचं स्थानही असंच आहे. खरं तर रेखाचा हा पुरस्कार आहे सिनेमासृष्टीसाठी.त्यामुळे "जीवनगौरव' म्हटलं काय आणि "प्रतिभागौरव' म्हटलं काय रेखाला का फरक पडावा?पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार या लेखाच्या सुरुवातीला रेखाताई म्हटल्याचाही राग आलाय म्हणे त्यांना!
published in mumbai sakal 30 may

न्यूनगंडाची भाषा

आजकाल डॉक्‍टर होण्यासाठी मध्यमवर्गीय पालक मुलांना रशियाला पाठवतात.असेच एक पालक भेटले. त्यांची मुलं सध्या रशियात मेडिकलला आहेत.रशियात गेल्यावर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा रशियन भाषा येण्यासाठी भाषेचा दोन महिन्यांचा मूलभूत कोर्स करावा लागतो.त्यानंतरही जेवढी वर्षं ते तिथं राहतील तितकी वर्षं रशियन शिकावं लागतं. रोजच्या व्यवहारात आसपासच्या माणसांशी रशियन बोलावं लागतं.कारण सामान्य लोक तीच भाषा बोलतात.परदेशी विद्यार्थ्यांना मेडिकलचा अभ्यासक्रम इंग्रजीत पूर्ण करता येतो. रशियन विद्यार्थी त्यांना हवं असेल तर इंग्रजी भाषेत शिकू शकतात. नाही तर रशियनमध्येही शिकू शकतात.कल्पना करा, रशियन विद्यार्थी मेडिकलचा सगळा अभ्यासक्रम रशियन भाषेत शिकू शकतो.आपल्याला एखादा शब्द शुद्ध मराठीत सांगितला तर समजत नाही.तो इंग्रजीत सांगितला तर त्याचा अर्थ लागतो.घरातून बाहेर पडलो, की आपल्याशी बोलणाऱ्या माणसाशी आपणच हिंदीत बोलायला सुरुवात करतो.घरात मूल जन्माला आलं, की त्याच्या शाळेबाबतचा पर्याय इंग्लिश मीडियम हाच असतो.यात चुकीचं काहीच नाही.जगाच्या स्पर्धेत आपलं मूल मागे पडू नये यासाठी आवश्‍यक आहे ते सगळं प्रत्येक आई-वडील करणारच.पण यातून दिसते ती आपली सामाजिक मानसिकता.परिस्थितीशी जुळवून घेण्याची.हिंदी लादली जातेय असं वाटलं तेव्हा तमीळ भाषकांनी नाही जुळवून घेतलं परिस्थितीशी.श्रीलंकेत तर भाषिक अस्मितेसाठी झालेला धगधगता संघर्ष सगळ्या जगानं बघितला आहे.भाषा हे आपलं साक्षात अस्तित्व असतं.आपलं संचित, आपली संस्कृती.आपल्या पिढ्यान्‌ पिढ्या त्या सत्वावर पोसलेल्या असतात.ते त्या त्या समूहाचं कुबेराचं धन असतं.अस्तित्वाचं, अस्मितेचं प्रतीक असतं.आणि आपल्या अस्तित्वावरच घाला येणार असेल तर कुणी तो कसा सहन करेल?खरं तर मराठी माणूसही सहन करणार नाही. तो तर त्याच्या ताठपणासाठी, मोडेन पण वाकणार नाही, या मराठी बाण्यासाठी प्रसिद्ध आहे.एकेकाळी तर त्याची दहशत वाटावी असा पराक्रम त्यानं करून दाखवलाय.मग त्याच्या भाषेवर होणारं आक्रमण तरी त्यानं का सहन करावं?पण मराठी माणूस त्याच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरला, की त्याचं वर्णन तथाकथित टीव्ही विचारवंत "प्रादेशिक संकुचितवाद' असं करतात. महाराष्ट्रात मराठी सक्तीची केली तर तोही मराठी माणसाचा संकुचित आग्रह होतो.इतरांची ती अस्मिता आणि मराठी माणसाचा तो "प्रादेशिकवाद?' असं का?मग रशियातला विद्यार्थी त्याच्या देशात त्याच्या भाषेत मेडिकलचा अभ्यास करून डॉक्‍टर बनू शकतो याला काय म्हणायचं?तमिळनाडूत, कर्नाटकात, पश्‍चिम बंगालमध्ये गेल्यावर कामचलाऊ का होईना त्या त्या ठिकाणची स्थानिक भाषा यावीच लागते.असे आग्रह धरण्याऐवजी आपण आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर आक्रमण होतंय अशी भाषा का करतो आहोत?ही न्यूनगंडाची भाषा आपण कधी टाकून देणार?
published in mumbai sakal 28 may

ना हरकत!

मनोहर जोशी यांना कोण ओळखत नाही?आख्खा महाराष्ट्र ओळखतो.नुसते मनोहर जोशी म्हणून नाही तर लोकसभेचे माजी सभापती, माजी मुख्यमंत्री, मुंबईचे माजी महापौर, शिवसेना नेते एवढंच नाही, तर कोहिनूर टेक्‍निकल इन्स्टिट्यूटचे "प्रिं' मनोहर जोशीसर म्हणूनही ओळखतो. एका आयुष्यात एवढं सगळं कर्तृत्व! त्यातले एकेक तपशील बघायला जाल तर काय म्हणाल?साधं "कोहिनूर'चं घ्या. त्या काळातल्या गरीब, मध्यमवर्गीय मुलांची गरज ओळखून "प्रिं' मनोहर "सरां'नी कोहिनूर टेक्‍निकल इन्स्टिट्यूट सुरू केल्या. इलेक्‍ट्रिशियन, प्लंबर, टीव्ही-रेडिओ, स्कूटर रिपेअरिंग, फोटोग्राफी अशी कौशल्य शिकून पोरांनी चार पैसे मिळवावेत यासाठी; पण त्याबरोबरच उद्या मुंबईतली गर्दी वाढत जाणार, स्टेशनजवळ असलेल्या इन्स्टिट्यूट लोकांसाठी सोयीच्या ठरतील असा उदात्त विचार करून कोहिनूरच्या सगळ्या शाखा स्टेशनजवळ सुरू केल्या. लोकांच्या सोयीचा केवढा मोठा विचार त्यात होता; पण त्याची कुणाला किंमतच नाही. कोहिनूरला सगळ्या मोक्‍याच्या जागा कशा मिळाल्या, असा प्रश्‍न विचारायला प्रसारमाध्यमं तयार! आताही परत तेच झालंय. एका वर्तमानपत्रात बातमी छापून आलीय. "प्रिं' मनोहर जोशी सरांच्या एका शागीर्दानं म्हणे त्याच्या शिक्षण संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयाला सरांचं नाव द्यायचं ठरवलंय. आधीचं नाव बदलून त्याजागी सरांचं नाव द्यायचंय म्हणे त्याला. त्यानं तशी नाव बदलायची परवानगी मागणारा अर्जही केलाय मुंबई विद्यापीठाकडे. आता असतं एखाद्याचं आपल्या सरांवर असं प्रेम. सरही ते जाणून आहेत. त्यामुळे सरांचीही या गोष्टीला काहीही हरकत नाही. सरांनीही तसं ना हरकतीचं पत्र दिलंय म्हणे; तर आता ज्यात त्यात नाक खुपसायची सवय असलेली प्रसारमाध्यमं मधेच कडमडलीत. हा खरं तर मुंबई विद्यापीठ, सरांच्या शागीर्दाची शिक्षण संस्था आणि सर या तिघांमधला मामला; पण नसती शोधपत्रकारिता करत तो फोडून गुरू-शिष्यांमधलं नातं चव्हाट्यावर आणण्याची प्रसारमाध्यमांना काहीतरी गरज होती का? गुरू-शिष्यांच्या नात्यातलं पावित्र्यं त्यांना काय कळणार म्हणा! महाराष्ट्राला शिक्षणाची किती उज्ज्वल परंपरा आहे. "प्रिं' मनोहर जोशी सर त्या परंपरेचे पाईक आहेत. शिवाय डी. वाय. पाटील, वसंतदादा पाटील अशा व्यक्तींच्या नावानंही महाविद्यालयं आहेत. मग सरांच्या नावावर एखादं महाविद्यालय असलं असतं तर काय बिघडलं असतं?साधं आधीचं नाव बदलून सरांचं नाव द्यायचा तर प्रश्‍न होता. तर त्यावरही या प्रसारमाध्यमांचा आक्षेप. काय तर म्हणे महाविद्यालयाचं आधीचं नाव महात्मा फुले यांचं आहे. "महात्मा फुले शिक्षण संस्थेचे आर्टस्‌, सायन्स ऍन्ड कॉमर्स' हे नाव बदलून तिथं सरांचं नाव द्यायला परवानगी कशी द्यायची, अशी विद्यापीठात कुजबूज आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. तेव्हा त्यांचं नाव कसं बदलायचं असा प्रश्‍न पडलाय म्हणे सगळ्यांना. या नतद्रष्टांना एवढंही कळत नाही की आज महात्मा फुले असते, तर त्यांनीही सरांच्या शागीर्दाकडे आपलं ना हरकत प्रमाणपत्र दिलं असतं "प्रिं' मनोहर जोशी सरांसाठी!आणि वर म्हणालेही असते "आम्ही पाया रचला म्हणून काय झालं... सरांनी कळस केलाय ना!'
published in sakal mumbai 27 may

Tuesday, May 26, 2009

कार्ड मनसेचं!

सबाजी शांताराम देसाई हे मनसे कार्यकर्ते. नातेवाईकांच्या लग्नासाठी ते मुंबईहून सिंधुदुर्गात कळणे येथे आले असता सिंधुदुर्गातील एका नागराजांनी त्यांच्या घरात चक्क घुसखोरी केली. "माझ्या घरात यायची तुझी हिंमत झालीच कशी? तुला माहीत नाही मी "मनसे'चा कार्यकर्ता आहे?'सबाजींनी त्या नागाला विचारलं."फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...' नागराज उत्तरले."तू मला ओळखत नाहीस? तुला माझं मनसेचं कार्ड दाखवू?' "फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'"अरे काय समजतोस काय तू स्वतःला? तुला मनसे माहीत नाही की काय? माझ्याकडे मनसेचं कार्ड आहे आणि तरीही तू माझ्या घरात शिरतोस?' सबाजींच्या प्रश्‍नावर नागमहाशय काहीच उत्तर देत नव्हते. नुसतेच फुसफुसत होते. "अरे माझ्यासारख्या मराठी माणसाच्या घरात तू घुसखोरी केल्याचं उद्या राजसाहेबांना कळलं, तर काय होईल तुझं माहिती आहे ना तुला? मराठी माणसावर झालेला अन्याय त्यांना जराही खपत नाही...' "फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'"अरे फुसफुस काय करतोस? सगळ्या मराठी माणसांनाही आमच्या राजसाहेबांची ही भूमिका सॉलिड पसंत आहे. म्हणूनच या लोकसभा निवडणुकीत आम्ही एवढी मतं काढलीत'"फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'"आणि आता माहितेय ना विधानसभा आल्यात. आमचे राजसाहेब म्हणताहेत की पुढचा मुख्यमंत्री मीच ठरवणार'"फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'"महाराष्ट्रात मराठी माणसाचाच आवाज चालला पाहिजे... काय कळलं ना?'"फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...' "माझ्या घरात मला न विचारता घुसतोस? आजपर्यंत हे सगळं चाललं असेल, पण इथून पुढे नाही चालणार. समजलं ना? आम्ही आतापर्यंत हजारात आणि लाखात खेळलो. आता आम्ही कोटीत खेळणार आहोत.'तरीही नागराज काहीच बोलेनात की घुसखोरी का केली ते सांगेनात.अरे लोकांनी मनसेला मतं दिली म्हणून मुंबईत परप्रांतीय निवडून आले म्हणे... अरे असं असेल तर असं म्हणणाऱ्यांनी तरी कुणाला मतं दिली रे? अरे हे सगळं राजसाहेब बोलले परवाच्या सभेत. लोकांनी काय सॉलिड टाळ्या दिल्यात... काय समजतोस! "फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'अरे मघापासून बोलतोय मी. तू बस नुसताच फुसफुसतो. ते परप्रांतीय इथं येतात म्हणून तर चाललंय हे सगळं! तुला काय म्हणा त्याचं! अरे बोल काही तरी. कुठून आलास बाबा? काय काम काढलंस? का आलास इथं? आखिर आये हो कहॉंसे?"फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...' नागराजांची फुसफुस चालूच होती. "काय म्हणतोस? यूपी? यूपीतून आलास तू?' सबाजींनी नागाच्या तोंडून चक्क यूपी ऐकलं.मग मात्र या निधड्या मनसेवीराचा पारा चढला. नागही परप्रांतीय?त्यानं आपल्या घरात घुसलेल्या नागराजासोबत तिथल्या तिथं राडा सुरू केला. लोक काहीही म्हणतात. यशाच्या धुंदीत मनसे कार्यकर्त्यानं तळीराम होऊन गोंधळ घातला म्हणे!त्यानं तर एका "परप्रांतीय' नागाशी दोन हात केले!
published in sakal mumbai 26 may 2009

Sunday, May 24, 2009

गर्दीत माणसांच्या...

मुंबई आणि मायानगरीही...गुजरातमधल्या धीरूभाई अंबानींनाही वाटतं की इथं आपलं नशीब उघडणार आणि अलाहाबादच्या अमित श्रीवास्तवलाही वाटतं की इथं आपल्याला आपली वाट सापडेल. उत्तर प्रदेशमधल्या सुलतानपूरसारख्या गावातल्या एका लहानगीलाही वाटतं मुंबईत जाऊ!सोळा वर्षांचं वय. कशाचा तरी डोक्‍यात धुमसणारा राग. घर नको, आईवडील नकोत.मुंबईत जाऊ. कॉल सेंटरला वगैरे नोकरी करू आणि काढू आपलं आपण सगळं आयुष्य! आहे काय त्यात?थेट असा विचार करून तिनं घरातून बाहेर पडली. नेहमीसारखी कोचिंग क्‍लासला गेली.आणि नंतर थेट बसली ती मुंबईच्या ट्रेनमध्ये.वय सोळा वर्षांचं. अकरावी सायन्स पास. बारावीसाठी तयारी सुरू. कशावरून तरी रागवलेले वडील एवढंच निमित्त!ऐकणाऱ्या कुणालाही वाटेल हे काय घर सोडून यायचं निमित्त आहे?पण तिच्या लहानशा डोक्‍यात तेच धुमसत असलेलं!त्यामुळे कोचिंग क्‍लासची पुस्तकं असलेलं दप्तर घेऊन तो वेडा जीव मुंबईत येऊन धडकला.तिचं काय काय होऊ शकतं या मुंबईत?सीएसटीसारख्या स्टेशनवर नेहमी जाणारी बाई पाच मिनिटं कुणाची वाट बघत रेंगाळली तरी तिला जीव नकोसा होऊन जातो.आणि ही सोळा वर्षांची कोवळी पोर अशी भिरभिरत्या नजरेनं इकडं तिकडं बघत आता काय करू या? कुठं जाऊ? या असा विचार करीत उतरली असती तर तिचं काय झालं असतं?अशा किती तरी जणी येऊन दाखल होतात रोज.कुणी बाजार सांभाळणाऱ्यांच्या हातात अलगद सापडतात.कुणी ज्युवेनाईल एड पोलिस युनिट अर्थातच "जापु' या पोलिसांच्या अल्पवयीन मुलांसाठी काम करणाऱ्या युनिटला सापडतात.तिथून त्यांची रवानगी बालसुधारगृहात आणि नंतर नीट घरी होते. घडलेल्या चुकीची जाणीव होते आणि घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येते.पण हे असं सगळ्यांच्याच वाट्याला येईल याची काय गॅरंटी?आयुष्यात एकदा केलेली चूक सुधारायची संधी प्रत्येकाला थोडीच मिळणार?पण या सोळा वर्षांच्या लहानगीच्या नशिबात काही वेगळंच होतं.भिरभिरत्या नजरेनं सीएसटी स्टेशनवर उतरण्याआधीच ट्रेनमध्ये असतानाच तिला कुणीतरी भेटलं.सोळाव्या वर्षी करायच्या अविचारी धाडसांच्या मालिकेतलं आणखी एक धाडस तिनं केलं. भेटलेल्या तरुणाला तिनं आपण काय, कुठून आलो, का आलो, काय झालं, हे सगळं तथाकथित विश्‍वासानं सांगून टाकलं. आता तिचा भार हलका झाला आणि त्याचा वाढला.हिचं काय करायचं? अकरावी सायन्सची परीक्षा दिलेली, मध्यमवर्गीय घरातली, डोक्‍यात राख घालून निघून आलेली मुलगी.मुंबईत जाऊन नोकरी करीन आणि माझी मी जगेन अशी तिची कल्पना.हिचं काय करायचं?त्यानं त्याच्या मित्राला बोलावून घेतलं. दोघांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला.तिच्याबरोबर सीएसटी स्टेशनवर दोनाचे पाच तास झाले. तिचा ठाम निर्धार होता मला घरी जायचंच नाही. त्यांनी फोनवरून एकदोघांशी चर्चा केली.दोघंही तिला "जापु'कडे घेऊन गेले. तिथं नेहमीचा घोळ. मुलगी जिथं सापडली त्या हद्दीतल्या पोलिसांकडे द्या.पुन्हा सीएसटी स्टेशन. तिथले रेल्वे पोलिस जेवायला गेलेले. पुन्हा तासभर गेला.आल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. यांची जबानी घेतली. आता तिची रवानगी बालसुधारगृहात होईल. तिचं पुन्हा पुन्हा काऊंसेलिंग होऊन तिला हळूहळू घरी जायला राजी केलं जाईल. तिच्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर येईल.मुंबईला हे अजिबात नवीन नाही. आयुष्यं उभी राहणं, मोडून पडणं, शिखरावर जाणं, रसातळाला जाणं... मुंबईसाठी हे सगळं रोजचंच. कधी इथे कधी तिथे. कधी याच्या बाबतीत, तर कधी त्याच्या बाबतीत. पण या धावत्या शहराला दुर्मिळ आहे ते थांबणं. कुणासाठी तरी थांबणं. त्याची चौकशी करणं. त्याला गरज आहे हे लक्षात आल्यावर त्याला वेळ देणं. आपलं काम सोडून, आपला वेळ खर्च करून त्याच्यासाठी वाट वाकडी करणं. रोजच्या जगण्यासाठी आपण जीवघेणी धाव घेत असताना असं थांबून कुणासाठी तरी मदतीचा हात पुढे करणं!हे करणारे दोघं जण माध्यमातलेच आहेत. "मी मराठी'चे योगेश बोरसे आणि "आयबीएन लोकमत'चे पत्रकार विशाल परदेशी!त्यांना हॅटस्‌ ऑफ!
published in mumbai sakal 23 may 09

गाव तिथं मर्सिडिझ...

लाल डबा असं म्हटलं की वेगळं काही सांगावं लागतं? नाही ना?लाल डबा म्हणजे आपली एसटी... आपल्या खऱ्याखुऱ्या भाषेत सांगायचं तर यष्टी!चांगलीचुंगली माणसं आजकाल तिला नाकं मुरडतात. कोण जाणार त्या लाल डब्यातून, असं म्हणतात.त्यांना हवी असते चकचकीत दिसणारी, गुबगुबीत खुर्च्या असलेली, पोटातलं पाणीही हलणार नाही, अशी एसी बस. ती ठरल्या ठिकाणाहून निघते, ठरल्या ठिकाणीच पोहोचते, वाटेत तिला फूड मॉल लागतात. तिथं सगळंच दुप्पट-तिप्पट किमतीला मिळतं.ती स्वतः एसटीच्या दुप्पट-तिप्पट पैसे घेते; पण पैसेवाल्यांना हवा असतो तो सगळा "कम्फर्ट'. तिथं अगदी पैसा वसूल असतो.आणि एसटी?विकत घेतानासुद्धा नवीन घेत नसावेत, असं तिचं रूपडं!हजार ठिकाणी ठोकलेली, पोचे आलेली, खिडक्‍या कधी उघडण्यासाठी नसाव्यातच आणि उघडल्या तर बंद होण्यासाठी नसाव्यात... ठिकठिकाणी गाडीत पान खाऊन काढलेली नक्षी... बंद पडू नये म्हणून सुरूच ठेवायची ती खास भारतीय स्ष्टाईल... आणि एकदा गाडी सुरू झाली की प्रवाशांना कंटाळा येऊ नये म्हणून खिडक्‍या दारांच्या खडखडाटाचं ते बॅकग्राउंड म्युझिक... दणकून आपटल्याशिवाय नीट बंदच न होणारे ते दरवाजे...किती गोष्टी सांगाव्यात यष्टीच्या?याच यष्टीनं आधुनिक व्हायचं ठरवलं तेव्हा विक्रम गोखलेंना ब्रॅंड ऍम्बॅसॅडर म्हणून आणलं होतं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे काल सगळीकडे झळकलेल्या बातम्या.पुणे मुंबई प्रवासासाठी एसटीने आता मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या बसची सेवा द्यायला सुरुवात केली आहे. आधी वोल्व्हो होतीच. आता मर्सिडिझ बेंझ!किती बदलला जमाना. ेएकेकाळी- एकेकाळी कशाला- 1982 मध्ये दिल्लीत एशियाड झालं तेव्हा सरकारनं आणलेल्या निमआराम गाड्याचंही केवढं कौतुक झालं होतं. आजही त्या गाड्यांना एशियाडच म्हणतात. म्हणजे एसटीचा प्रवास लाल डब्यापासून मर्सिडिझ बेंझपर्यंत!या सगळ्या काळात एसटीनं काय काय पाहिलंय.हळूहळू ती तोट्यात गेली. त्याला तिच्या गैरकारभाराची, बेशिस्तीची, अरेरावीची जोड होतीच. गावोगावी बेकायदेशीर खासगी वाहतूक त्यातूनच वाढत गेली.साताठ जणांची क्षमता असणाऱ्या गाडीत पंधरा-पंधरा जण वाहून नेणारे खासगी व्यावसायिक वाढले. लांबच्या प्रवासासाठी लक्‍झरी बस आल्या. अगदी एसटीनंही वोल्व्हो सुरू केल्या.पण लाल डब्याची एसटी ती एसटी. तिच्या सगळ्या दुर्गुणांसकट तिला एक मानवी चेहरा आहे. प्रत्येक गाव आणि प्रत्येक रस्ता तिला माहिती आहे. गाव तिथं एसटी हे ब्रीदच होतं तिचं!त्या रस्त्यावरून, त्याच लाल डब्यातून तालुक्‍याच्या गावाला जात किती पिढ्यांची शिक्षणं झालीत. फक्त एवढंच नाही, तर एसटी आहे या भरवशावर किती आयाबायांनी अगदी विश्‍वासानं आपल्या पोरीबाळींना शिकायला पाठवलंय. किती आजारी माणसं आणि किती अडलेल्या बायकांना तालुक्‍याच्या गावाला पाठवून एसटीनं किती जीव वाचवलेत.अगदी दुर्गम भागातल्या किती गावांना दिवसातून एकदा तरी जाऊन एसटीनं त्यांना जगाशी जोडलंय.हे सगळं करताना कधी फायद्या-तोट्याचा प्रश्‍नच नव्हता.माणसं महत्त्वाची होती. तीही कुणी पैसेवाली, व्हीआयपी नव्हे तर खेड्यापाड्यात राहणारी. ज्यांच्या हातात पैसा फारसा खुळखुळत नसतो अशी. खरीखुरी जनता!पैसेवाल्यांकडून पैसा ओढणाऱ्या गाड्या कुणीही उडवील. मर्सिडिझ बेंझच्या गाड्या आणून एसटीनंही ते ओढावेत. अगदी उद्या "गाव तिथं मर्सिडिझ' अशी घोषणा करण्याची ऐपत एसटीवर येवो.पण एसटीनं आपला मानवी चेहरा विसरू नये एवढंच!

published in sakal mumbai 22 may 09

अहो ऐकलंत का?

अहो ऐकलंत का, ही हाक ऐकल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष करायची कुठल्या "अहों'ची टाप आहे? ही हाक ऐकली की तेवढ्यापुरते कान टवकारायचे हे घरोघरी ठरलेलं असतं. भले, त्यानंतर कानावर येणारा सगळा मजकूर नंतर कानाबाहेर किंवा कानामागे टाकला जात असेल; पण त्याक्षणी तरी अटेन्शन! सावधान!पण आता तसं करून चालणार नाही. कारण तसा तंबीवजा सल्ला सर्वोच्च न्यायालयानेच दिलेला आहे. हवाई दलात अधिकारी असलेल्या दीपक कुमार यांच्या घटस्फोटाच्या खटल्यासंदर्भातली याचिका न्या. मार्कंडेय आणि न्या दीपक वर्मा यांच्या खंडपीठासमोर आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान या खंडपीठानं जगातल्या तमाम नवऱ्यांना "लग्नानंतरच्या आयुष्यात शांतता हवी असेल तर बायको जे सांगत असेल ते ऐका' असा सल्ला दिला आहे.खंडपीठ म्हणतं, "बायको जे म्हणते ते ऐका. तिने ऊठ म्हटलं तर उठा. बस म्हणेल तेव्हा बसा. बायकोने दिलेला सल्ला व्यावहारिक आहे की नाही, हे न पाहता त्याची अंमलबजावणी करा. नाहीतर तुमच्या लग्नात संघर्ष निर्माण होईल.' जजमहाशयांच्या या टिप्पणीवर तमाम बायका खूष झाल्या असतील. म्हणजे रोजच्या संसारात त्यांना जे व्हावं असं वाटतं ते त्याच्यावर न्यायालयानंही शिक्कामोर्तब केलं की! म्हणजे जीत भी मेरी आणि पट भी मेरीही!आणि तमाम नवरोबा या टिप्पणीमुळे वैतागले असतील. म्हणजे एरवीही होणार बायकोला हवं तेच; पण आता न्यायालयानंही तेच सांगावं? हे म्हणजे लढाई करायला निघालेल्याला तहाचं पांढरं निशाण नीट इस्त्रीबिस्त्री करून कसं फडकवायचं ते सांगणं झालं.कुणाला आवडेल ते? असं म्हटलं जातं की नवरा-बायको ही जगातली सगळ्यांत मूलभूत, सगळ्यांत आदिम "पोलिटिकल रिलेशनशिप' असते. दोन्ही बाजू नकळतपणे आपापल्या "जमातीं'चे इंटरेस्ट जपायचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. विरोधी पक्ष अस्तित्वात असतो म्हणून आपल्या बाजूलाही धारदारपणा असतो. समोरची बाजू आपल्या म्हणण्याला विरोध करते ते ती आपल्या अस्तित्वाची दखल घेते म्हणून. म्हणजे आपल्या अस्तित्वाची दखल घेणाराही तेवढाच महत्त्वाचा. तोही हवाच. आता बायको लवकर उठायची कटकट करते म्हणून नवरे लवकर उठायला लागले, वेळेवर आवरायला लागले, वेळेत घरी यायला लागले, सगळं तिच्या मनासारखं करायला लागले तर काय मजा? मग तिनंही कटकट कुणाला करायची? आडून आडून आणि घालून पाडून कुणाला बोलायचं? चारचौघींमध्ये कशावर चर्चा करायची? लग्नामध्ये फक्त एकच बाजू कायम बरोबर, योग्य असते, ती अर्थातच बायकोची, अशा आशयाची एक म्हण इंग्रजीत आहे. जगातले असे सगळे विनोद मग कशावर होणार?असं सगळं खूप सुरळीत चाललेलं जग हवंय कुणाला?
published in sakal 21-05-09