Thursday, April 29, 2010

अस्मिता आपली आणि त्यांची!

मराठीसाठी आता सरकारनं स्वतंत्र खातं नेमायचं ठरवलं आहे. आनंद आहे. पण या खात्याचं इतर खात्यांसारखं "सरकारीकरण' होऊ नये. पण तरीही प्रश्‍न पडतातच. हे खातं नेमकं काय करेल? आपल्या भाषेवर प्रेम करा हे मुळात आपल्याच लोकांना सांगयला लागणं हे किती दुर्देवी आहे. स्वभाषेबद्दल कमालीची अनास्था बाळगणारी आपल्यासारखी कर्मदरिद्री जमात जगात कुठेही नसेल.

गेल्याच महिन्यात मी थायलंडला गेले होते. पर्यटकांना दाखवले जाणारे वेगवेगळे कार्यक्रम बघत होते. थायी कल्चरल शो असो, की ओरांग उटांग शो, एलिफंट शो असो की डॉल्फिन शो, हे सगळे शो बघायला बहुसंख्य पर्यटकच होते. म्हणजे पर्यटकांना अर्थातच परदेशी पर्यटकांना समोर ठेवूनच त्यांची निर्मिती केलेली होती. तरीही हे सगळे शो थायी भाषेतच होते. शोच्या शेवटी थोडक्‍यात त्यांचा सारांश सांगितला जायचा.

पर्यटनावर हा देश मोठ्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पर्यटकांसाठी या देशाने मखमली पायघड्या घातल्या आहेत. अगदी सेक्‍स टुरिझमही वाढवलं आहे. पण आपल्या भाषेची अस्मिता मात्र गहाण ठेवलेली नाही.

आपण मात्र सगळ्यात पहिल्यांदा तीच गहाण टाकली आहे.

Thursday, April 22, 2010

बीज अंकुरले... अंकुरले!

चंद्रपूर, लातूरमधल्या लहान लहान गावांमध्ये राबवल्या गेलेल्या विकासशाळांमध्ये भाग घेतलेली ही मुलं. अगदी टीपकागदासारखी. त्यांना फक्त आपलंच आयुष्य बदलायचं नाहीय तर आसपासचा समाजही बदलायचा आहे. त्यासाठी ते करत असलेल्या संघर्षाची ही अनोखी कहाणी.

-----
चार वर्षांपूर्वी चंद्रपूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये लहानलहान गावांमध्ये फिरणं झालं, त्यावेळी युनिसेफचा एसआयडी म्हणजेच स्कूल इन डेव्हलपमेंट हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला होता. गावातल्या लहान मुलांना एकत्र करून आठ दिवसांचं ट्रेनिंग व्हायचं. ट्रेनिंगमध्ये त्यांना गावाचा नकाशा काढणं, घरं, लोकसंख्या मोजणं, शाळाबाह्य मुलं मोजणं, गावात शाळा आहे का, दवाखाना आहे का, शौचालयं आहेत का याच्या नांदी करणं हे शिकवलं जात होतं. आठ दिवस एकत्र येऊन हा सगळा सर्व्हे करताना त्या मुलांना हळूहळू गावातल्या प्रश्‍नांची जाणीव होईल अशी त्यामागची कल्पना होती. लहान मुलं ही विकासाचे दूत मानून तो सगळा कार्यक्रम उभा राहणार होता. एसटीसुध्दा जात असेल नसेल अशा गावातली ही मुलं. शैक्षणिक वातावरण, सुविधा, आर्थिक परिस्थिती या सगळ्याच पातळीवर मुख्य प्रवाहापासून निव्वळ भौगोलिक कारणामुळे बाजूला पडलेली. त्यांच्यामध्ये अमाप उत्साह, इच्छाशक्ती असली तरी त्यांच्याभोवतीचं एरवीचं वातावरणच असं की टिपकागदाप्रमाणे असलेल्या त्यांच्या या उत्साहाचं, कोणतीही नवी गोष्ट शिकण्याच्या आनंदाचं या ट्रेनिंगनंतर काय होणार?याच गावांमधली मुलं नुकतीच मुंबईत भेटली. दूरदर्शनवर ... कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आलेली. त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडत गेलं ते त्यांचं जगण्याचं विद्यापीठ...चंद्रपूरमधल्या नंदुरी गावात राहणारी सुवर्णा तांबट. ही तरतरीत मुलगी नववीमध्ये होती तेव्हा तिच्या वडिलांचा अपघात झाला. बदललेल्या परिस्थितीत सगळ्यात पहिला घाला आला तो तिच्या शिक्षणावर. तिला मात्र शिकायचं होतं. दीपशीखा प्रकल्पातून तिला शिक्षणाचं महत्त्व पटलं होतं. काहीतरी बनण्यासाठी नीट शिकलं पाहिजे हे तिच्या मनानं घेतलेलं होतं. त्यामुळे ती शिक्षण सोडायला अजिबात तयार नव्हती. ते बघून घरातल्या लोकांना इतका राग आला की "घरातून चालती हो' असं तिला सांगितलं गेलं. तशीच उठून ती तिच्या भावोजींकडे गेली. "घरातून हाकललं आहे हे कळल्यावर तेही मला घरात घ्यायला तयार होईनात.' ती सांगते, मग मी मैत्रिणीच्या घरी गेले. त्यांनी मात्र मला राहू दिलं. शेतात मजुरी करत आपल्या शिक्षणापुरते पैसे जमवत मी दहावी पूर्ण केली.' अकरावीसाठी तिनं प्रवेश घेतल्यानंतर मात्र आईवडिलांना कानकोंडल्यासारखं व्हायला लागलं. ते तिला बोलवायला आले. "आपल्या घरी राहून शीक' असं म्हणाले. आता तिनं बारावीची परीक्षा दिली आहे.---लातूरमधल्या वडगाव निलंग्यातला प्रदीप झरे आठवीत शिकतो. त्याच्या गावात आलेल्या विकासशाळेचं ट्रेनिंग त्यानं घेतलं आहे. लहान मुलांनी शिकलं पाहिजे, मुलींचं लग्न अठराव्या वर्षांनंतर करायचं असतं ही माहिती त्याला या विकासशाळेत मिळालेली. गावातल्या स्वाती वाघमारे या मुलीचं लग्न जुळवलं गेलं होतं. ती आपल्याच वयाची म्हणजे तेरा वर्षांची आहे, ही खात्रीलायक माहिती होती. प्रदीपनं आपल्याबरोबर गावातली इतरही मुलं गोळा केली. ही सगळी वानरसेना त्या मुलीच्या आईवडिलांना भेटली. अठरा वर्षांच्या आधी या मुलीचं लग्न करू नका, तिला शाळेत पाठवा असा आग्रह त्यांनी धरला. मुलीच्या आईवडिलांनी आपली दखल घेतलेली नाही हे लक्षात आल्यावर मात्र मुलांनी "आशादीप'च्या कार्यकर्त्यांना, गावातल्या मान्यवरांना बोलावून मुलीच्या आईवडिलांशी चर्चा करायला लावली. गावाच्या दबावामुळे आता ती मुलगी शिक्षण घेते आहे. गावातलाच भरत वाळके नावाच्या मुलाला शाळेत पाठवलं जात नव्हतं. गावातल्या मुलांनी भरतच्या आईवडिलांमागे सारखा लकडा लावून भरतला शाळेत पाठवायला भाग पाडलं आहे.---मंजुळा मडावी ही चंद्रपूरमधल्या आंबेजरी गावची. ती दहावीत असताना आईवडिलांनी तिचं लग्न जुळवलं. विकासशाळेत ट्रेनिंग घेऊन शिकण्याची स्वप्नं बघत असलेल्या मंजुळासाठी हा धक्काच होता. तिनं लग्नाला नकार दिला. "मी लग्नाला तयार नाही म्हटल्यावर आईवडिलांनी मला खूप मारलं. सगळ्यांसमोर मारलं.' मंजुळा सांगते. लग्न करणार असलीस तरच इथे रहा. नाहीतर या घरात रहायचं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मग मीही तशीच घराबाहेर पडले. काकाच्या घरी गेले. गावात सगळ्यांना ही बातमी समजली तेव्हा माझ्या सरांनी जाऊन आईवडिलांशी बोलणं केलं. मग आईवडिल काकाच्या घरी आले आणि शिकवायचं कबूल करून मला घरी घेऊन गेले. आता मंजुळा बारावी आर्टस्‌ करते. तेरा वर्षाच्या तिच्या मैत्रिणीची सगाईही तिनं मैत्रिणीच्या आईवडिलांशी पुन्हा पुन्हा बोलून आपलं उदाहरण देऊन रोखायला लावली आहे. तिनं आणि तिच्या मित्रमंडळीनी मुलांना शाळेत पाठवायला तयार नसलेल्या पालकांना भेटून मुलांना शाळेत पाठवायला भाग पाडलं आहे. तिच्याकडे चिठ्ठी वाचून घ्यायला येणाऱ्यांना ती सांगते, मी आज ना उद्या लग्न करून गेले की मग तुम्ही काय कराल? त्यापेक्षा मुलांना लिहायला वाचायला शिकवा. ---अकरावीत शिकणाऱ्या चंद्रपूरच्या शशिकला आडेची कहाणीही अशीच. युनिसेफच्या प्रशिक्षणामुळे डोळे उघडलेले आणि धाडसही आलेलं. अल्पवयात ठरवल्या जात असलेल्या लग्नाला विरोध केला म्हणून तिलाही भावांचा मार खावा लागला. पण मार खाऊनही तिनं जिद्द सोडली नाही. शाळेतल्या शिक्षकांमार्फत तिनं आईवडिलांना समजावलं. तिचं शिक्षण परत सुरू झालं. पण आपल्यापुरता प्रश्‍न मिटला म्हणून ती गप्प बसली नाही. "माझ्या शेजारी राहणाऱ्या दोन मुलींना शिकायचं होतं. पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना वावरात कामाला पाठवलेलं होतं.' शशिकला सांगते, "मग मी जाऊन त्यांच्या आईवडिलांशी बोलले. ते माझं ऐकेनात म्हणून सरांना घेऊन गेले. सरांनी समजावून सांगितल्यावर आता त्या मुली शाळेत जायला लागल्या आहेत. ---"मुलं आज सांगत आहेत तितकं हे सगळं सहज सोपं नाही.' चंद्रपूर जिल्हा युवक मंडळाचे या मुलांबरोबर आलेले कार्यकर्ते सांगतात. "मुलं या पातळीवर येण्यासाठी गेल्या तीन चार वर्षात सतत कार्यक्रम घेतले गेले. पूर्वी या मुली मीटींगलाही यायला तयार नसत. बोलायला तयार नसत. आता त्या बॅंकेचे व्यवहारही करतात. "आशादीप'चे बाबासाहेब चव्हाण सांगतात, स्कूल इन डेव्हलपमेंट म्हणजेच विकासशाळेत आम्ही मुलांना बालविवाह, मुलांचे हक्क याविषयीचं ट्रेनिंग दिलं. प्रत्येक गावात असा किशोरवयीन मुला- मुलींचा गट तयार केला. असे गट तयार केल्यामुळे बालविवाहांची माहितीही मुलांच्याच माध्यमातून मिळते आणि बालविवाहही रोखता येतात. मुलांच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षभरात असे पाच ते सहा बालविवाह रोखले आहेत. फक्त बालविवाह रोखणं, शाळेत पाठवणं एवढ्यावरच ही मुलं थांबलेली नाहीत. विाकसळाळेच्या माध्यमातून त्यांना एखादं स्वप्न दाखवलं की ती त्या स्वप्नाच्याच मागे लागतात. काही गावांमध्ये स्वच्छ, सुंदर, हागणदारीमुक्त गाव आणि आरोग्याचा काय संबंध असतो हे त्यांना समजावून सांगितलं गेलं. शौचालयं असतील तर निम्मे आजार कमी होतील, हे पटल्यावर मुलांनी आपल्या आईवडिलांकडे घरात शौचालय हवंच असा आग्रह धरला. आईवडील तयार होत नसतील तिथे उपोषणाच्या धमक्‍या दिल्या. घरातलं पोर काही खात नाही हे बघितल्यावर आईवडिलांपुढे काही पर्यायच नव्हता. ---या मुलांच्या या लढाया शहरी मुलांच्या तुलनेत कदाचित चमकदार, नेत्रदीपक वगैरे नसतील, पण त्या त्यांचा उद्या घडवणाऱ्या आहेत.

Sunday, April 18, 2010

गंगेमध्ये एक ओंजळ...!

गंगेबद्दल भारतीय माणसाच्या मनात जितका खोलवर रूजलेला जिव्हाळा आहे, तितकीच गंगेच्या प्रदूषणाबद्दल अनास्था. गंगेच्या प्रदूषणामुळे अस्वस्थ झालेल्या फोटोग्राफर विजय मुडशिंगीकरांनी गेली दहा वर्ष आपलं अवघं आयुष्यच गंगार्पण करून टाकलंय. त्यांनी काढलेल्या गंगेच्या विविध फोटोंचं फिरतं प्रदर्शन घेऊन ते येत्या पाच मार्चपासून गंगेच्या उगमापासून ते ती जिथं समुद्राला मिळते त्या टोकापर्यंत फिरणार आहेत. देशभर प्रांतवादाची बिजे पेरली जात असताना एक मराठी माणूस आपल्या खिशाला खार लावून गंगेच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी धडपडतो आहे!
-----
कशासाठी जगायचं या प्रश्‍नाचं उत्तर कुणाला कधी आणि कसं सापडेल याचा नेम नसतो हेच खरं. कुणाला ते आयुष्याच्या सुरूवातीलाच सापडतं आणि त्याच्यासाठी सगळं आयुष्य आनंदयात्रा बनून जातं. तर कुणाला ते सगळे टक्केटोणपे खाऊन झाल्यावर, आता काय उरलं असं वाटत असताना सापडतं आणि मग त्याची आयुष्याची संध्याकाळ सोनेरी होऊन जाते.विजय मुडशिंगीकरांना ते सापडलं स्लिप डिस्कनं अंथरूणाला खिळलेले असताना. कोल्हापुरात पंचगंगेच्या काठावर बालपण गेलेला हा माणूस. क्रॉम्पटन ग्रीव्हजमध्ये साधा कामगार. वाढत्या वयात कधीतरी मित्राच्या नादानं कॅमेरा हातात आला. फोटोग्राफीचं रीतसर प्रशिक्षण कधी घेतलं नाही, पण मित्रामुळेच शिकत शिकत लग्नासाठीचे फोटो काढायला सुरूवात केली. बघता बघता छंदाचा "साईड बिझनेस' झाला. सगळं नीट सुरळीत चाललेलं. पण 1998 मध्ये त्यांना एक अपघात झाला. त्यातून स्लिप डिस्क. जराही हलता यायचं नाही. आता आपण आपल्या पायावर उठून उभे तरी राहू की नाही हा एकच प्रश्‍न मन खात होता. वेळ जाण्यासाठी हातात येतील ती पुस्तकं वाचत होते. अशातच त्यांच्या हातात सुरेशचंद्र वारघडेंचं "हिमयात्री' हे पुस्तक पडलं. ते पुस्तक वाचताना ते इतके भारावून गेले की परत कधीमधी चालू शकलोच तर हिमालयात नक्की जायचं असं त्यांनी ठरवलं. सुदैवानं डॉ. प्रेमानंद रामाणींच्या स्लिप डिस्कवरच्या नव्या शोधामुळे ते ऑपरेशननंतर सातआठ दिवसात ठणठणीत झाले. आता मिळालेलं आयुष्य हे बोनस आहे, असा विचार करत त्यांनी मित्रांना गोळा करून त्यांनी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक केला. एकदा हिमालय बघायला गेलेल्या माणसाला हिमालय पुन्हापुन्हा तिथं यायला भाग पाडतो. तसंच त्यांचंही झालं. तिथल्या नद्यांच्या तर ते इतक्‍या प्रेमात पडले की गंगेच्या उगमापासून ते गंगासागरपर्यंत टप्प्याटप्प्याने त्यांनी अनेकदा प्रवास केला. गोमुखपासून, हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत नितळशंख असलेली गंगा पुढेपुढे कानपूर, पाटण्याला इतकी प्रदूषित होत गेलेली बघून ते अतिशय व्यथित झाले. उगमाच्या ठिकाणी अमृत मानलं गेलेलं गंगेचं पाणी नंतर बघवत नाही, इतकं खराब होतं, हे सगळं रोखण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या त्यांच्या अस्वस्थपणाला उत्तर होतं, फोटोग्राफी! अर्थात हातात पैसे नसत, रजा मिळत नसत, पण डोक्‍यात फक्त उगमापासून नितळस्वच्छ असलेली आणि दुसऱ्या टोकाला प्रदूषित होत गेलेली गंगा नदी असायची. महिन्याच्या पगाराचे पैसे खर्च करून ते गंगेचं खोरं गाठत. त्यामुळे ते तिकडे जाऊन नेमकं काय करतात हे बघायला त्यांची पत्नी थेट त्यांच्याबरोबर गोमुखला आली होती. उगमापासून, टोकापर्यंतच्या गंगेच्या टप्प्यांचे त्यांनी अनेकदा फोटो काढले. या सगळ्या फोटोंची संख्या जवळपास पाच हजारांच्या घरात जाईल. घरातल्या लोकांना त्यांचं हे काम करण्याची मनापासूनची ओढ लौकरच लक्षात आल्यामुळे त्यांना पहिल्यापासूनच सहकार्य मिळायला लागलं. इतकं की निवडक 120 फोटोंचं प्रदर्शन मांडून लोकांमध्ये गंगेच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करायचं त्यांनी ठरवलं तेव्हा फोटोंना लॅमिनेशन करण्याचा खर्च वाचवण्यासाठी त्यांचं सगळं कुटुंब घरात लॅमिनेशन करत बसायचं. जणू काही विक्रोळीला कन्नमवार नगरात, कामगारवस्तीत असलेल्या त्यांच्या सव्वादोनशे फुटांच्या घरात हे सगळे फोटोच रहायचे आणि उरलेल्या जागेत घरातली माणसं! नंतर त्यांच्या एका मित्रानं फोटो प्रदर्शन ठेवायला जागा दिली. गंगेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या प्रवास मांडणारे फोटो काढायचे हा प्रकल्प म्हणून त्यांनी स्वतशीच ठरवला तेव्हा मुख्य प्रश्‍न होता पैशांचा. इतर कुणी मदत करेल का, एवढंच नाही तर अशी मदत करणारी लोकं असू शकतात, एनजीओ काढता येऊ शकते असं काहीही समोर नसताना केवळ आपली इच्छा म्हणून मुडशिंगीकर गंगेच्या खोऱ्यात जात राहिले. 2005 मधली गोष्ट. त्यांना बिहारमध्ये गंगेच्या काठावर होणाऱ्या छटपूजेचे फोटो काढायचे होते. नेहमीप्रमाणे हातात पैसे नव्हतेच. इकडे कंपनीत ले ऑफ जाहीर झालेला. दोन दोन, तीन तीन महिने पगार होत नव्हता. बरोबरच्या लोकांमध्ये उद्या नोकरीचं काय होणार ही चिंता तर मुडशिंगीकर पटण्याला जाण्यासाठी पाच-सहा हजार रूपये गोळा करण्यात गुंतलेले. बरोबरचे सहकारी म्हणत अरे, कंपनीत काय चाललंय आणि तू काय करतोयस? शेवटी त्यांनी हे काम करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते म्हणतात, माझ्याकडे तर पैसे नसायचेच. मग मी तिकीट काढायचो आणि तिकडे पोहोचायचो. गंगेसाठी हे काम करतो आहे, हे सांगितलं की सामान्य लोक पैसे द्यायचे. सगळीकडे असणाऱ्या महाराष्ट्र मंडळांमध्ये जाऊन मी काय आणि का करतो ते सांगितलं की राहण्याची व्यवस्था तीनशे रूपयात असेल तर मला शंभर सव्वाशे रूपयात जागा मिळायची. क्रॉम्पटन ग्रीव्हजमधल्या वरिष्ठांनी बिनपगारी रजांच्या बाबतीत सगळ्या मर्यादा संपल्यावरही या प्रकल्पासाठी म्हणून सहकार्य केलं आहे. हे सगळं काम पुढे नेण्यासाठी त्यांनी आता "गंगाजल नेचर फाऊंडेशन' नावाची संस्था स्थापन केली आहे.गंगेला जशा अनेक नद्या येऊन मिळतात, तशी मुडशिंगीकरांच्या कामाशी अनेक लहानमोठी माणसं जोडली गेली असली तरी या सगळ्या डोलाऱ्याचा मुख्य खांब ते स्वतच आहेत. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये गंगेच्या नितळ सौंदर्याचे, तसंच तिच्या प्रदूषणाच्या फोटोंची आजवर अनेक प्रदर्शनं मांडून त्यांनी नव्या पिढीला गंगेच्या समृध्द वारशाची तसंच तिच्या प्रदूषणाच्या प्रश्‍नांची जाणीव करून दिली आहे. सामान्य माणूस गंगेकडे धार्मिक, भावनिक दृष्टीने बघत असतो, त्याला गंगेच्या प्रदूषणाबाबत जागृत केलं पाहिजे, म्हणून ते फोटो प्रदर्शनाचा खटाटोप सतत मांडत राहतात. या सगळ्या कामासाठी त्यांनी बॅंकेकडे कर्ज मागितलं. पण गंगेचं सुंदर, मोहक रूपडं दाखवण्यासाठी बॅंका कर्ज द्यायला तयार आहेत, मात्र प्रदूषणाचा एकही फोटो दाखवायचा नाही, अशी त्यांची अट आहे. महाराष्ट्रातले राजकारणी त्यांना गंगा ही "आपली' नव्हे तर "त्यांची' नदी आहे, मग आपण कशाला पैसे द्यायचे, असं उत्तर देतात. तर उत्तर प्रदेशातले राजकारणी हा सगळा खटाटोप "आमच्याकड'ची माणसं करतील की त्यासाठी महाराष्ट्रातून कुणी कशाला यायला हवं, असं उत्तर देतात. तर अलाहाबादमधली एक संस्था म्हणते, हे सगळं फोटो प्रदर्शन आम्हाला विकत द्या. आणि तुम्ही या सगळ्या कामातून बाजूला व्हा, आम्ही ते पुढे नेऊ.यातला कोणताच पर्याय मुडशिंगीकरांना मान्य नाही. ते म्हणतात, गंगा सुंदर आहेच, पण ती कशी प्रदूषित झाली आहे, ते दाखवलं जाईल तेव्हाच तिचं सौंदर्य टिकवलं पाहिजे याचं गांभीर्य पटेल. आणि हे काम मी सुरू केलं आहे आणि मला त्याच्याशी जोडलेलं रहायचं आहे. निव्वळ कुणी पैसे देतं म्हणून मी यातून कसा बाजूला होऊ? हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. म्हणूनच येत्या पाच मार्चपासून मी आणि माझे काही मित्र गंगेच्या उगमापासून ते गंगासागरपर्यंत गंगेच्या फोटोंचं प्रदर्शन घेऊन फिरणार आहोत. गंगेच्या काठावर येणारे हजारो लोक रोज हे प्रदर्शन बघतील. आपण या प्रदूषणाला कळत-नकळत कसे हातभार लावतो हे त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते जागे होतील. या सगळ्या टप्प्यांवर आम्ही आमच्या पातळीवरून गंगा शुध्दीकरण शिबिरं भरवणार आहोत. या सगळ्या दरम्यानच्या गंगेच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याच्या प्रदूषणाचा अहवाल सगळ्यात शेवटी सरकारला सादर केला जाणार आहे. गंगेच्या प्रदूषणाबद्दल आस्था असलेल्या सर्वसामान्य लोकांकडून मिळेल ती मदत घेऊन महिनाभराचा हा दौरा आहे. या दौऱ्यासाठी सामान्य माणसांनी जवळपास पाच लाखांचा आर्थिक हातभार लावला आहे.अनंत अडचणी, आर्थिक तोशीस असं सगळं असूनही विजय मुडशिंगीकर आपल्या या कामावर ठाम आहेत.का?ते म्हणतात, मला परत उभं तरी राहता येईल की नाही, अशी शंका होती अशा काळात मला मी इथे ओढला गेलो. आता या सगळ्या परिसरासाठी, गंगेसाठी काहीतरी करणं ही मला माझी जबाबदारी वाटते!
----
चौकट- 1भारतीय माणसाच्या दृष्टीनं गंगा ही फक्त जीवनदायिनी नदी नाही तर त्याच्या सगळ्या जन्मजन्माच्या फेऱ्यांशी जोडली गेलेली गंगामैय्या आहे. गोमुखपासून म्हणजे उगमापासून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून गंगा कोलकात्याजवळ गंगासागर इथं समुद्राला मिळते. या सगळ्या प्रवासात तिला जवळपास ऐंशी नद्या येऊन मिळत. सगळ्या नद्यांनी वाहून य गाळामुळे समृध्द झालेल्या गंगेच्या खोऱ्यावर आजही आपली चाळीस टक्के लोकसंख्या अलंबून आहे. गंगेचं आर्थिक, सामाजिक, धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन राजीव गांधींच्या काळात गंगा ऍक्‍शन प्लान आला. हरिद्वारला लावलेल्या फिल्ट्रेशन प्लान्टमुळे हरिद्वार ऋषिकेशला गंगेचं पाणी स्वच्छ आहे, पण खरा प्रश्‍न आहे, तो पुढेच. वाराणसीमध्ये घाटावर आंघोळ करायला, कपडे धुवायला, गायीम्हशी पाण्यात सोडायला बंदी आहे. आणि ती काटेकोरपणे पाळली जाते. पण त्याच नदीत शहराचं सांडपाणी सोडलं जातं, मुडशिंगीकर सांगतात. पुढे कानपूर पटण्याला तर शहराचं सांडपाणी, नदीच्या काठाकाठानं असलेल्या कारखान्यांमधलं रसायनमिश्रित पाणी या सगळ्यामुळे गंगेचं प्रदूषण वाढत गेलं आहे. चौकट-2गंगेच्या उगमापाशी म्हणजे गोमुखला श्रावण महिन्यात भरणाऱ्या कावड यात्रेवर आता उत्तरांचल सरकारनं पूर्ण बंदी आणली आहे. ही कावड यात्रा म्हणजे यात्रेकरू प्लास्टिकची कावड घेऊन गोमुखला जातात. तिथे ती विसर्जित करून नव्या कावडीमध्ये गंगाजल घेऊन त्याचा अभिषेक गावातल्या शंकराला करायचा अशी प्रथा. यात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे या यात्रेवर बंदी आहे. आता गोमुखला फक्त गिर्याहोरकांनाच सोडलं जातं. तेही ते नेतील त्या वस्तूंची यादी करून. त्या वस्तू त्यांनी परत आणल्या हेही तपासलं जातं. गोमुखला होणारं प्रदूषण रोखण्यासाठी ही काळजी घेतली जाते.
----
वेबसाईट- http://www.gangagal.org.in/
vijaymudshingikar@gangajal.org.in

----

पूर्वप्रसिध्दी- सकाळ, सप्तरंग पुरवणी

कुतुहलांचा देश

केसरी टूर्सच्या "माय फेअर लेडी'बरोबर थायलंडला जायचं ठरलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आठवला पुलंच्या "पूर्वरंग'मधला सयाम! भरपूर पाण्याचा, त्यामुळेच कालव्यांचा देश. दोन्ही हात जोडून ऱ्हदयापासून नमस्कार करणाऱ्या लोकांचा देश! त्याही पूर्वीचा "ऍना अँड द किंग ऑफ सयाम'मधल्या राजपुत्र महामोंगकूटचा देश! पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत पिचलेल्या या देशात साधारण दीडशे वर्षांपूर्वी ऍना नावाची ब्रिटिश शिक्षिका राजघराण्यातल्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी येते. तिथली गुलामगिरी बघून तडफडते, कळवळते. पण त्याचबरोबर शांतपणे मुख्य राजपुत्राच्या, महामोंगकूटच्या मनावर समतेचे, बंधुतेचे संस्कार करते. दोन तीन वर्षात ती निघून जाते. पण तरूणपणी राजा बनल्यावर हाच महामोंगकूट एका फटक्‍यात कायद्यानं गुलामगिरी बंद करून टाकतो. एक साधी शिक्षिका एका देशाचं भवितव्यच कसं बदलून टाकू शकते हे सांगणाऱ्या या कादंबरीनं थायलंडबद्दल कुतुहल निर्माण करण्याचं काम चोख बजावलं होतं. प्रत्यक्ष थायलंडला गेल्यावरही हे कुतुहल पावलोपावली भेटत राहिलं. कधी तृतीयपंथीयांच्या गेली 28 वर्षे सुरू असलेल्या अल्काझार शोच्या रूपात. कधी वॉकिंग स्ट्रीटच्या रूपात. कधी खुलेआम चालणाऱ्या ऍडल्ट शोच्या रूपात. या देशाला स्त्रीदेहाच्या प्रदर्शनाचं, व्यापाराचं, त्यातून मिळणाऱ्या डॉलरचं जराही वावडं नाही, याचा अचंबा वाटावा, पट्टायात चालणारं सेक्‍स टुरिझमचं उघडंनागडं स्वरूप बघून डोकं आणि मन गरगरावं तर बॅंकाकमध्ये भलीमोठी, देखणी बुध्दमंदिरं समोर येतात. आपल्याकडे गणेशोत्सवात आणि एरवीही जसा गणपती वेगवेगळ्या लडिवाळ रूपात दिसतो तसाच यांचा बुध्दही. विश्रांती घेत असलेला, ध्यान लावून बसलेला, चालणारा आणि सोन्याचा बुध्द! वयाच्या विसाव्या वर्षी प्रत्येक थायी पुरूषाला एक वर्षभरासाठी बौध्द भिख्खू बनावं लागतं. आणि नंतरही संसाराचा, नोकरीबिकरीचा कंटाळा आला, विरक्‍त व्हावंसं वाटलं, तर तीन महिन्यांसाठी भिख्खू बनता येतं. त्यासाठी कायद्यानं तीन महिने भर पगारी सुट्टी मिळते.म्हणजे एकीकडे सेक्‍स टुरिझमसाठी विदेशी पर्यटकांना मखमली पायघड्या आणि दुसरीकडे तात्पुरत्या विरक्तीसाठी भरपगारी रजा!बॅंकॉकमधल्या गोल्डन बुध्दाची गोष्टही अशीच! दहा फूट उंच आणि साडेपाच टन किलो वजनाच्या या मूर्तीचं मूळ तेराव्या शतकापर्यंत जातं. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी थायलंडमधल्या अयुध्यावर बर्मी लोकांनी आक्रमण केलं. या आक्रमकांपासून मूर्तीचं रक्षण करण्यासाठी तत्कालीन भिख्खूंनी तिच्यावर मातीसदृश पण कठीण लिंपण केलं. ती मूर्ती बॅंकॉकला आणण्यात आली. 1955 मध्ये मूर्ती नवीन मोठ्या मंदिरात ठेवायची होती. त्यासाठी क्रेनमधून नेताना मूर्ती खाली पडली. हा अपशकून मानून मूर्ती वाहून नेणारे मजूर पळून गेले. रात्रभर मूर्ती तशीच पावसात पडून राहिली. दुसऱ्या दिवशी तिची परिस्थिती बघण्यासाठी आलेल्या भिख्खूंना दिसली ती पावसानं सगळं लिंपण वाहून गेल्यानंतरची लखलखीत सोन्याची मूर्ती! देवळात त्या मूर्तीसमोर बसून हे सगळं ऐकताना फक्त 55 वर्षांपूर्वी घडून गेलेलं हे सगळं अद्‌भूत तसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. दगडमातीची म्हणून वाहून नेली जात असलेली मूर्ती अशी सोन्यानं झळाळत समोर आल्यावर त्या भिख्खूंच्या डोळ्यांत काय उमटलं असेल याची कल्पनाच केलेली बरी! थायलंड समोर येतो तो आपल्या देशात आलेल्या पर्यटकांना खूष करून टाकण्याचं व्रत घेतल्यासारखा. स्त्रीदेहापलीकडे ज्यांना निसर्ग, समाज- संस्कृतीबिंस्कृती अशा कशातच रस नाही, त्यांच्यासाठीचा थायलंड वेगळा. पण ज्यांना निसर्गाबरोबर समाधी लावायची आहे, त्यांच्यासाठी पांढरीशुभ्र वाळू आणि निळंशार पाणी असलेला कमालीचा नितळसुंदर समुद्र आहे. पर्यटनाच्या चौकटीत राहून ज्यांना साहस अनुभवायचं आहे, त्यांच्यासाठी पॅरासेलिंगचा, समुद्राखालचं अनोखं जग अनुभवण्याचा थरार आहे. जातीच्या खवय्यांसाठी जिभेचे चोचले पुरवणारं थायी कुझीन आहे. (त्यातही कुणाला वेगळेपणाचा आनंद चाखायचा असेल, तर आपल्याकडे गाडीवर वडापाव, भेळ विकली जाते, तसे वेगवेगळ्या प्रकारचे खारवलेले, तळलेले किडे आहेत.) जातीच्या शॉपिंगबहाद्दरांसाठी बॅंकॉकमधल्या बाजारपेठा ओसंडून वहात असतात. पट्टायामध्ये जगातली सर्वात मोठी हिरे- मोत्यांची शोरूम आहे. पण या शोरूममध्ये शिरण्याआधी एका लहानशा ट्रॉलीमधून एक दहा मिनिटांची सैर घडवून आणली जाते. हिऱ्यांच्या खाणीचा आभास निर्माण करून, हिरे कसे सापडतात, त्यांच्यावर कशी प्रक्रिया केली जाते, पैलू कसे पाडले जातात, ही सगळी प्रक्रिया दाखवून ती ट्रॉली आपल्याला सोडते ती हिरे मोत्यांच्या भव्य शोरूम मध्ये. या दहा मिनिटांच्या ट्रेलरसाठी जी वातावरणनिर्मिती केली आहे, तिच्यामुळे हिऱ्यामोत्यांच्या शोरूममधून तुम्ही आपोआपच काहीतरी मौल्यवान खरेदी करून बाहेर पडता. नोंग नूंच व्हिलेजमधला कल्चरल शो असो की हत्तींचा शो. सफारी वर्ल्ड मधला ओरांग ऊटांग शो, डॉल्फिन शो असो की स्टंटमॅन शो!हे सगळे शो तुम्हाला खिळवून ठेवतातच, पण ते सादर करताना कुठेही, थायी भाषेची कास सोडलेली नसते. शोच्या शेवटी इंग्रजीत त्याचा सारांश सांगितला जातो एवढंच. परक्‍यांच्या भाषेला आपलं मानण्यात आणि आपल्या भाषेला परकं करण्यात जगात आपला हात कुणीच धरू शकणार नाही हेच खरं!समुद्रावरचे थरारक खेळ असोत की जंगल सफारी, ते पाहताना वाटत होतं, आपल्याला किती विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे, किल्ले आहेत, जंगलं, प्राणी, हवामान या सगळ्याचं आपल्याकडे किती वैविध्य आहे. आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी नाही. पण या सगळ्याचं आपण काय करतो? मुद्दाम जंगलं निर्माण करून, देशाबाहेरून प्राणीपक्षी आणून सफारी वर्ल्ड निर्माण करायची आपल्याला गरज नाही की नोंग नूंचसारखं खेडं तयार करून पर्यटकांना रिझवण्याची आपल्याला काहीच गरज नाही. निसर्गानं, संस्कृतीनं आपल्याला उदंड हस्ते दिलं आहे. गरज आहे ती त्या सगळ्याचं नीट व्यवस्थापन करण्याची!
चौकट
केसरीची "माय फेअर लेडी' चार वर्षांपूर्वी झाली ती थायलंडमधून. "एखादं कुटुंब पर्यटनाला जातं, तेव्हा त्या कुटुंबातली बाई ही नवऱ्याला काय हवं नको, मुलांच्या गरजा यातच गुरफटलेली असते. ती खऱ्या अर्थानं पर्यटनाचा आनंद घेऊ शकत नाही. तिनंही पर्यटन एन्जॉय करावं म्हणून माय फेअर लेडीची कल्पना पुढे आली.' केसरी टूर्सच्या प्रमुख वीणा पाटील सांगतात. आता माय फेअर लेडी दरवर्षी थायलंडच्याच चार टूर करते. त्याशिवाय अमेरिका, इंग्लंडसाठीही माय फेअर लेडीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता माय फेअर लेडी देशांतर्गत टूरही करते आहे. "होम मिनिस्टर'चे आदेश बांदेकर माय फेअर लेडीचे ब्रॅंड ऍम्बॅसिटर आहेत. मार्च महिन्यात थायलंडला गेलेला माय फेअर लेडीचा ग्रुप 56 जणींचा होता. यात मायलेकींच्या, विहिणींच्या, नणंदभावजयांच्या जोड्या होत्या. काहीजणी तर मुलीनं, मुलान किंवा सुनेनं टूर गिफ्ट दिली म्हणून एकेकट्याच पहिल्यावहिल्या परदेशप्रवासासाठी आल्या होत्या. वयोगट पंचवीस वर्षापासून 75 वर्षांपर्यंत. ना रोजच्या स्वयंपाकाची कटकट, ना नवऱ्याची, मुलांची भूणभूण, ना रोजच्या रूटीनचा ससेमिरा... रोज नवनवीन गोष्टी बघायच्या, नवनवीन अनुभव घ्यायचे, हसायचं, नाचायचं, गायचं, पाण्यात डुंबायचं, हवेत उडायचं, पाण्याखालचं जग बघायचं... पट्टायात कमीत कमी कपड्यात वावरणाऱ्या स्त्रियांपासून रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खारवलेल्या किड्यांपर्यंत सगळंच नवीन, वेगळं. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव असो की आदेश बांदेकर यांच्या भाषेत सगळ्या माय फेअर लेडींचं "इंटरनॅशनल' फॅशन शोमध्ये कॅट वॉक असो, हे आठ दिवस या सगळ्या जणींना पुढची कित्येक वर्षे इतकी उर्जा देतात. जाताना विमानात "ऑरेंज ज्यूस या रेड वाईन' या एअर होस्टेसच्या प्रश्‍नाला एका सत्तरीच्या पुढच्या आजींनी "रेड वाईन' हे उत्तर दिलं आणि डोळे मिचकावून म्हणाल्या एकदा घेऊन बघायचीच होती कशी लागते ते! परतायच्या आदल्या दिवशी ग्रुपमधल्या एका मध्यमवयीन बाईंनी विचारलं, "मला तुमची जीन्स द्याल एक दिवस घालायला. कधीतरी घालून बघायची आहे.'आपल्या मनातल्या गोष्टी करून बघायला आपल्या बायकांना दुसरा देश गाठावा लागतो, हे आपल्या संस्कृतीचं अपयश मानायचं की "माय फेअर लेडी'चं यश?