Thursday, April 22, 2010

बीज अंकुरले... अंकुरले!

चंद्रपूर, लातूरमधल्या लहान लहान गावांमध्ये राबवल्या गेलेल्या विकासशाळांमध्ये भाग घेतलेली ही मुलं. अगदी टीपकागदासारखी. त्यांना फक्त आपलंच आयुष्य बदलायचं नाहीय तर आसपासचा समाजही बदलायचा आहे. त्यासाठी ते करत असलेल्या संघर्षाची ही अनोखी कहाणी.

-----
चार वर्षांपूर्वी चंद्रपूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये लहानलहान गावांमध्ये फिरणं झालं, त्यावेळी युनिसेफचा एसआयडी म्हणजेच स्कूल इन डेव्हलपमेंट हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला होता. गावातल्या लहान मुलांना एकत्र करून आठ दिवसांचं ट्रेनिंग व्हायचं. ट्रेनिंगमध्ये त्यांना गावाचा नकाशा काढणं, घरं, लोकसंख्या मोजणं, शाळाबाह्य मुलं मोजणं, गावात शाळा आहे का, दवाखाना आहे का, शौचालयं आहेत का याच्या नांदी करणं हे शिकवलं जात होतं. आठ दिवस एकत्र येऊन हा सगळा सर्व्हे करताना त्या मुलांना हळूहळू गावातल्या प्रश्‍नांची जाणीव होईल अशी त्यामागची कल्पना होती. लहान मुलं ही विकासाचे दूत मानून तो सगळा कार्यक्रम उभा राहणार होता. एसटीसुध्दा जात असेल नसेल अशा गावातली ही मुलं. शैक्षणिक वातावरण, सुविधा, आर्थिक परिस्थिती या सगळ्याच पातळीवर मुख्य प्रवाहापासून निव्वळ भौगोलिक कारणामुळे बाजूला पडलेली. त्यांच्यामध्ये अमाप उत्साह, इच्छाशक्ती असली तरी त्यांच्याभोवतीचं एरवीचं वातावरणच असं की टिपकागदाप्रमाणे असलेल्या त्यांच्या या उत्साहाचं, कोणतीही नवी गोष्ट शिकण्याच्या आनंदाचं या ट्रेनिंगनंतर काय होणार?याच गावांमधली मुलं नुकतीच मुंबईत भेटली. दूरदर्शनवर ... कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आलेली. त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडत गेलं ते त्यांचं जगण्याचं विद्यापीठ...चंद्रपूरमधल्या नंदुरी गावात राहणारी सुवर्णा तांबट. ही तरतरीत मुलगी नववीमध्ये होती तेव्हा तिच्या वडिलांचा अपघात झाला. बदललेल्या परिस्थितीत सगळ्यात पहिला घाला आला तो तिच्या शिक्षणावर. तिला मात्र शिकायचं होतं. दीपशीखा प्रकल्पातून तिला शिक्षणाचं महत्त्व पटलं होतं. काहीतरी बनण्यासाठी नीट शिकलं पाहिजे हे तिच्या मनानं घेतलेलं होतं. त्यामुळे ती शिक्षण सोडायला अजिबात तयार नव्हती. ते बघून घरातल्या लोकांना इतका राग आला की "घरातून चालती हो' असं तिला सांगितलं गेलं. तशीच उठून ती तिच्या भावोजींकडे गेली. "घरातून हाकललं आहे हे कळल्यावर तेही मला घरात घ्यायला तयार होईनात.' ती सांगते, मग मी मैत्रिणीच्या घरी गेले. त्यांनी मात्र मला राहू दिलं. शेतात मजुरी करत आपल्या शिक्षणापुरते पैसे जमवत मी दहावी पूर्ण केली.' अकरावीसाठी तिनं प्रवेश घेतल्यानंतर मात्र आईवडिलांना कानकोंडल्यासारखं व्हायला लागलं. ते तिला बोलवायला आले. "आपल्या घरी राहून शीक' असं म्हणाले. आता तिनं बारावीची परीक्षा दिली आहे.---लातूरमधल्या वडगाव निलंग्यातला प्रदीप झरे आठवीत शिकतो. त्याच्या गावात आलेल्या विकासशाळेचं ट्रेनिंग त्यानं घेतलं आहे. लहान मुलांनी शिकलं पाहिजे, मुलींचं लग्न अठराव्या वर्षांनंतर करायचं असतं ही माहिती त्याला या विकासशाळेत मिळालेली. गावातल्या स्वाती वाघमारे या मुलीचं लग्न जुळवलं गेलं होतं. ती आपल्याच वयाची म्हणजे तेरा वर्षांची आहे, ही खात्रीलायक माहिती होती. प्रदीपनं आपल्याबरोबर गावातली इतरही मुलं गोळा केली. ही सगळी वानरसेना त्या मुलीच्या आईवडिलांना भेटली. अठरा वर्षांच्या आधी या मुलीचं लग्न करू नका, तिला शाळेत पाठवा असा आग्रह त्यांनी धरला. मुलीच्या आईवडिलांनी आपली दखल घेतलेली नाही हे लक्षात आल्यावर मात्र मुलांनी "आशादीप'च्या कार्यकर्त्यांना, गावातल्या मान्यवरांना बोलावून मुलीच्या आईवडिलांशी चर्चा करायला लावली. गावाच्या दबावामुळे आता ती मुलगी शिक्षण घेते आहे. गावातलाच भरत वाळके नावाच्या मुलाला शाळेत पाठवलं जात नव्हतं. गावातल्या मुलांनी भरतच्या आईवडिलांमागे सारखा लकडा लावून भरतला शाळेत पाठवायला भाग पाडलं आहे.---मंजुळा मडावी ही चंद्रपूरमधल्या आंबेजरी गावची. ती दहावीत असताना आईवडिलांनी तिचं लग्न जुळवलं. विकासशाळेत ट्रेनिंग घेऊन शिकण्याची स्वप्नं बघत असलेल्या मंजुळासाठी हा धक्काच होता. तिनं लग्नाला नकार दिला. "मी लग्नाला तयार नाही म्हटल्यावर आईवडिलांनी मला खूप मारलं. सगळ्यांसमोर मारलं.' मंजुळा सांगते. लग्न करणार असलीस तरच इथे रहा. नाहीतर या घरात रहायचं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मग मीही तशीच घराबाहेर पडले. काकाच्या घरी गेले. गावात सगळ्यांना ही बातमी समजली तेव्हा माझ्या सरांनी जाऊन आईवडिलांशी बोलणं केलं. मग आईवडिल काकाच्या घरी आले आणि शिकवायचं कबूल करून मला घरी घेऊन गेले. आता मंजुळा बारावी आर्टस्‌ करते. तेरा वर्षाच्या तिच्या मैत्रिणीची सगाईही तिनं मैत्रिणीच्या आईवडिलांशी पुन्हा पुन्हा बोलून आपलं उदाहरण देऊन रोखायला लावली आहे. तिनं आणि तिच्या मित्रमंडळीनी मुलांना शाळेत पाठवायला तयार नसलेल्या पालकांना भेटून मुलांना शाळेत पाठवायला भाग पाडलं आहे. तिच्याकडे चिठ्ठी वाचून घ्यायला येणाऱ्यांना ती सांगते, मी आज ना उद्या लग्न करून गेले की मग तुम्ही काय कराल? त्यापेक्षा मुलांना लिहायला वाचायला शिकवा. ---अकरावीत शिकणाऱ्या चंद्रपूरच्या शशिकला आडेची कहाणीही अशीच. युनिसेफच्या प्रशिक्षणामुळे डोळे उघडलेले आणि धाडसही आलेलं. अल्पवयात ठरवल्या जात असलेल्या लग्नाला विरोध केला म्हणून तिलाही भावांचा मार खावा लागला. पण मार खाऊनही तिनं जिद्द सोडली नाही. शाळेतल्या शिक्षकांमार्फत तिनं आईवडिलांना समजावलं. तिचं शिक्षण परत सुरू झालं. पण आपल्यापुरता प्रश्‍न मिटला म्हणून ती गप्प बसली नाही. "माझ्या शेजारी राहणाऱ्या दोन मुलींना शिकायचं होतं. पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना वावरात कामाला पाठवलेलं होतं.' शशिकला सांगते, "मग मी जाऊन त्यांच्या आईवडिलांशी बोलले. ते माझं ऐकेनात म्हणून सरांना घेऊन गेले. सरांनी समजावून सांगितल्यावर आता त्या मुली शाळेत जायला लागल्या आहेत. ---"मुलं आज सांगत आहेत तितकं हे सगळं सहज सोपं नाही.' चंद्रपूर जिल्हा युवक मंडळाचे या मुलांबरोबर आलेले कार्यकर्ते सांगतात. "मुलं या पातळीवर येण्यासाठी गेल्या तीन चार वर्षात सतत कार्यक्रम घेतले गेले. पूर्वी या मुली मीटींगलाही यायला तयार नसत. बोलायला तयार नसत. आता त्या बॅंकेचे व्यवहारही करतात. "आशादीप'चे बाबासाहेब चव्हाण सांगतात, स्कूल इन डेव्हलपमेंट म्हणजेच विकासशाळेत आम्ही मुलांना बालविवाह, मुलांचे हक्क याविषयीचं ट्रेनिंग दिलं. प्रत्येक गावात असा किशोरवयीन मुला- मुलींचा गट तयार केला. असे गट तयार केल्यामुळे बालविवाहांची माहितीही मुलांच्याच माध्यमातून मिळते आणि बालविवाहही रोखता येतात. मुलांच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षभरात असे पाच ते सहा बालविवाह रोखले आहेत. फक्त बालविवाह रोखणं, शाळेत पाठवणं एवढ्यावरच ही मुलं थांबलेली नाहीत. विाकसळाळेच्या माध्यमातून त्यांना एखादं स्वप्न दाखवलं की ती त्या स्वप्नाच्याच मागे लागतात. काही गावांमध्ये स्वच्छ, सुंदर, हागणदारीमुक्त गाव आणि आरोग्याचा काय संबंध असतो हे त्यांना समजावून सांगितलं गेलं. शौचालयं असतील तर निम्मे आजार कमी होतील, हे पटल्यावर मुलांनी आपल्या आईवडिलांकडे घरात शौचालय हवंच असा आग्रह धरला. आईवडील तयार होत नसतील तिथे उपोषणाच्या धमक्‍या दिल्या. घरातलं पोर काही खात नाही हे बघितल्यावर आईवडिलांपुढे काही पर्यायच नव्हता. ---या मुलांच्या या लढाया शहरी मुलांच्या तुलनेत कदाचित चमकदार, नेत्रदीपक वगैरे नसतील, पण त्या त्यांचा उद्या घडवणाऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment