Sunday, August 30, 2015

छोटे छोटे आनंद

सकाळी सकाळी बाहेर पडले होते. काम आटोपून परत आले. बिल्डिंगमध्ये एक छोटीशी नवीन शेड तयार केली होती. टू व्हीलर लावण्यासाठी. काही जणांनी तिथं टू व्हीलर लावल्याही होत्या. त्या शेडखालीच एका बाजूला लहान मुलांच्या सायकली अस्ताव्यस्त टाकून दिलेल्या होत्या. त्या नीट ठेवल्या असत्या तर आणखी काही टू व्हीलरना जागा झाली असती. तेवढ्यात सोसायटीचा वॅचमन तिथे आला. त्याला म्हटलं या सायकली नीट ठेवल्या तर आणखी काही टू व्हीलर्सना जागा होईल. हे माझं सांगणं म्हणजे आपण एखाद्याला एखादी गोष्ट सुचवतो त्या पद्धतीचं होतं. त्यानं पटकन त्या सायकली हलवायला घेतल्या. माझं सांगणं त्याला आर्डरवजा वाटलं होतं बहुतेक. एकदम कसंतरीच वाटलं. मग मीही माझी टू व्हीलर स्टॅण्डला लावली आणि भराभरा त्याला मदत करायला सुरुवात केली. दहा मिनिटांत आम्ही दोघांनी त्या सगळ्या सायकली तिथून बाजूला केल्या आणि परत तिथेच शिस्तीत लावल्या. एकदम झ्याक दिसायला लागली ती जागा आणि वर आणखी दोनच नाही तर चार टू व्हीलर्ससाठी जागा तयार झाली. वॅचमन म्हणाला आता हे बघायलापण मस्त वाटतंय मलाही एकदम मस्त वाटलं. जी गोष्ट व्हायला हवी असं मला वाटत होतं ती मीच करून टाकली होती कुणीतरी करेल याची वाट न बघता. आख्खा दिवस आनंदात जायला एवढी एकच गोष्ट पुरली. आयुष्यात असे छोटे छोटे आनंद कधी मिळालेच नसतील का इंद्राणी मुखर्जीला ?

Wednesday, April 20, 2011

जागतिकीकरणाचा धबडगा सुरू झाला, तेव्हा विरोधकांच्या अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा असायचा भाषेचा. परकीय कंपन्या इथे येणार, त्यांचे व्यवहार इंग्रजी भाषेत चालणार, ती भाषा येऊ शकणारे तरतील, बाकीच्यांनी अशा व्यवस्थेत काय करायचं? कसं जगायचं? नव्या व्यवस्थेत त्यांचं काय होणार? इंग्रजीचा वापर इतका वाढेल की स्थानिक भाषांचा ऱ्हास कसा अटळच आहे वगैरे वगैरे...
असं काही झालं नाही, हे आपण बघतोच आहोत. खरं तर त्याच्या उलट झालं आहे.
आपल्या प्रचंड लोकसंख्येला आपला बोजा मानणारी सगळी बाहेरची मंडळी आपली बाजारपेठ खुली झाल्यावर चक्क त्याकडे मनुष्यबळ म्हणून बघायला लागली. ही बाजारपेठ कशी काबीज करायची, याचा विचार करायला लागली. एवढा मोठा देश, तिथे नांदणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृती, त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा, चालीरीती, मुख्य म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या 22 भाषा आणि जवळजवळ सोळाशे बोलीभाषा, या सगळ्यांची मिळून बनलेली प्रचंड बाजारपेठ. ती आपल्याला हवी तशी वळवून घेण्यापेक्षा आपण तिला हवं ते देणं हा मार्ग त्यांनी निवडला. त्यासाठीचा महत्त्वाचं माध्यम होतं ते इथल्या भाषा. इथलं भाषिक वास्तव समजून घेतल्याशिवाय इथे आपल्याला आपले हात-पाय पसरता येणार नाहीत, हे मार्केटवाल्यांना पक्कं माहीत आहे. त्यामुळेच भारतातल्या प्रादेशिक भाषांच्या पातळीवर सतत वेगवेगळे सर्व्हे होत असतात. या अभ्यासातून, पुढे आलेल्या माहितीतून वेगवेगळे निष्कर्ष काढले जात असतात.
अशा पाहण्यांमधून पुढे आलेलं एक निरीक्षण म्हणजे भारतात प्रादेशिक पातळीवर तरी इंग्रजी ही दुय्यमच भाषा आहे. टीव्ही असो, वर्तमानपत्रं असोत, रेडिओ असो बहुसंख्य भारतीय जनतेचा कल तिच्या स्थानिक भाषेकडेच असतो. याचं कारण म्हणजे एका आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येच्या 37 टक्के (शहरी); तर 17 टक्के (ग्रामीण) लोकांनाच इंग्रजी नीटपणे येतं. शहरी, तसेच ग्रामीण भागातले उर्वरित लोक इंग्रजीशी तेवढे सरावलेले नसतात. साहजिकच ते इंग्रजी भाषेतून होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या संवादापासून, कॉम्प्युटर, इंटरनेटपासून दूर राहतात. सुरुवातीच्या काळात शहरी, मध्यम - उच्च मध्यमवर्गीयांच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केलेल्या उत्पादकांना नंतर हा ग्राहकही काबीज करणं गरजेचं वाटायला लागलं. इंग्रजीपासून दूर राहणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी त्या ग्राहकांची भाषा ही अर्थातच मोठं माध्यम होतं.
या गरजेतून भारतीय भाषांचा अभ्यास सुरू झाला, तेव्हा पुढे आलेली निरीक्षणं विचार करण्याजोगी आहेत. 1996 मध्ये आपल्याकडे एकूण 60 टीव्ही चॅनेल्स होते. आता त्यांची संख्या 300 पेक्षाही जास्त आहे. आज 1996 च्या तुलनेत 500 टक्के जास्त संख्येने टीव्ही प्रोग्रॅमिंग केलं जातं, तेही स्थानिक भाषांमध्ये. टीव्हीवर बातम्या, तसेच करमणुकीचे कार्यक्रम बघण्यासाठी भारतीय माणूस त्याच्या भाषेला प्राधान्य देतो. त्याला बातम्यांपासून जाहिरातीपर्यंत सगळं त्याच्या भाषेत हवं असतं. 2007-08 या वर्षातल्या आकडेवारीनुसार टीव्हीवर राष्ट्रीय पातळीवरच्या जाहिरातींचा वाटा 14.6 टक्के होता; तर प्रादेशिक पातळीवरच्या जाहिरातींचा वाटा 22.7 होता.
इंटरनेटवरही हीच परिस्थिती आहे. इंटरनेटवर सर्च इंजिन, पोर्टलसाठी भारतीय लोकांचं त्यांच्या स्थानिक भाषेलाच प्राधान्य असतं. ई-मेल, चॅटिंगसाठी ट्रान्सलेशन टूल, युनिकोड किंवा रोमन लिपी वापरून भारतीय भाषेत लिहिलं जातं. इंगजीपेक्षा या पद्धतींचं प्रमाण जास्त आहे. हीच पद्धत वापरून भारतीय भाषांमध्ये ब्लॉगिंग करण्याचं प्रमाण खूप आहे. वेगवेगळी मीडिया हाऊसेस बातम्यांच्या वेबसाईट चालवितात, त्यांनाही स्थानिक भाषेतल्या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळतो. एक गमतीशीर निरीक्षण म्हणजे जी विवाहविषयक पोर्टल्स स्थानिक भाषेत असतात, ती चटकन लोकप्रिय होतात. विशेष म्हणजे हिंदीपेक्षा इतर भारतीय भाषांमधल्या वेबसाईटची संख्या जास्त आहे.
सर्च इंजिन, सोशल नेटवर्किंग साईटस्‌, व्यवसायविषयक वेबसाईटस्‌ अशा "युटिलिटी साईटस्‌'पेक्षा वैयक्तिक ब्लॉगिंग, करमणूक, बातम्या तेही स्थानिक भाषेत यांना भारतीय माणूस जास्त प्राधान्य देतो. शहरातला एक विशिष्ट वर्ग वगळला, तर उर्वरित सामान्य माणसाचे रोजचे व्यवहार त्याच्या भाषेतूनच होतात. तीच त्याची जगाचे व्यवहार समजून घेण्याची भाषा असते. इंग्रजीच्या अडथळ्यामुळे तो आपल्यापर्यंत पोचत नसेल, तर आपण त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे हे वास्तव बाजारपेठेला उमगायला लागलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.
---

चौकट-
जगातल्या सगळ्यात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या 10 भाषांची यादी केली, तर ती चायनीज, इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश, रशियन, जर्मन, अरेबिक, बंगाली, पोर्तुगीज, जपानी अशी आहे. म्हणजे हिंदी ही भारतीय भाषा त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे; पण इंटरनेटवर सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या 10 भाषांची यादी केली, तर ती इंग्रजी, चिनी, स्पॅनिश, जपानी, फ्रेंच, जर्मन, अरेबिक, पोर्तुगीज, कोरियन, इटालियन अशी आहे. भारतातली एकही भाषा इंटरनेटच्या "टॉप टेन'मध्ये नाही, याचं कारण म्हणजे इंटरनेटसाठी इंग्रजी येणं आवश्‍यक आहे, हा समज.

(आधार- आयएमआरबी म्हणजेच इंडियन मार्केट रिसर्च ब्युरोने केलेल्या भारतातल्या प्रादेशिक भाषांसंदर्भात केलेल्या पाहणीचा अहवाल)
---------------

आयसीयूतून परत आलेल्या भाषा!


Monday, March 14, 2011

ट्रायलिंग्वल बना!

पंधरा-वीस वर्षांपूर्वी सांगली-साताऱ्याला जाणं म्हणजे प्रवास मानणाऱ्या मंडळींची मुलं सांगली-साताऱ्याला जावं तितक्‍या सहजपणे इंग्लंड-अमेरिकेत जाऊन येत आहेत. देशातल्या देशातही नोकरीसाठी या राज्यातून त्या राज्यात फिरण्याचं तरुण पिढीचं प्रमाणही वाढतं आहे. या सगळ्यांतून निर्माण होणारी भाषिक घुसळण नवे भाषिक प्रश्‍न निर्माण करते आहे.
---
पंधराएक वर्षांपूर्वी शहरातल्या मध्यमवर्गीय घरांमध्ये मूल शाळेत जायच्या वयात आलं, की हमखास एक वाद रंगायचा. तो म्हणजे त्या मुलाला कुठल्या शाळेत घालायचं? मराठी माध्यमाच्या की इंग्रजी? घरातली आजी, मुलाची आई यांचा कल मराठी माध्यमाकडे असायचा. आपले संस्कार व्हायला हवेत, इंग्रजी शिकून मूल आपल्या हाताबाहेर जाईल, घरात कोण इंग्रजीचा अभ्यास घेणार, अशी कारणं सांगून मराठीचा आग्रह धरला जायचा. तर इंग्रजीच्या आग्रहामागे पुढे चांगल्या नोकऱ्या मिळविण्यासाठी इंग्रजीतून शिकणं कसं गरजेचं आहे, हा युक्तिवाद असायचा. आज निदान शहरांमध्ये तरी शाळेच्या पातळीवर मराठीनं इंग्रजीपुढे पूर्ण शरणागती पत्करली आहे. मुलांना मराठी माध्यमात घालायचं की इंग्रजी हा वाद आता मध्यमवर्गीय घरात झडत नाही. कारण- शिक्षणाचं माध्यम मराठी नाही, तर इंग्रजी हे स्वीकारलं गेलं आहे.
खरं तर सगळ्याच प्रमुख भारतीय भाषा बोलणारे समाज आज या चक्रव्यूहात सापडले आहेत. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिलं, तर ती इंग्रजीला सरावत नाहीत. साहजिकच ती चांगल्या नोकऱ्या, चांगल्या संधींपासून लांब जातात. त्याचा आर्थिक फटका बसतो. वैयक्तिक पातळीवर हे नुकसान जास्त महागात पडतं. त्यांना इंग्रजीतूनच शिक्षण दिलं, तर ती हळूहळू मातृभाषेपासून दुरावत जातात; पण जगण्याच्या लढाईत ती वरचढ ठरण्याची शक्‍यता असते. सामान्य माणसाचं देणं-घेणं रोजच्या जगण्याच्या संघर्षाशी असतं. त्यामुळे मातृभाषेपेक्षा तो रोजीरोटी मिळवून देणाऱ्या भाषेला प्राधान्य देणार हे उघडच आहे. वीसेक वर्षांपूर्वी वरच्या स्तरात असलेला हा ट्रेंड मध्यमवर्गात झिरपला आणि हळूहळू तो निम्न मध्यमवर्गातही झिरपतो आहे.
कुणाला पटो न पटो; पण भाषिक बहुविधता असलेल्या आपल्या देशात वरच्या पातळीवर इंग्रजी आणि तळाच्या पातळीवर हिंदी याच व्यवहारभाषा झाल्या आहेत. मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यांना, मुख्य प्रवाहात राहू इच्छिणाऱ्यांना या भाषा येण्याशिवाय पर्याय नाही.
अशा परिस्थितीत स्थानिक भाषा म्हणजेच मातृभाषा कामचलाऊ ठरत जाण्याचा धोका असतो. मराठी भाषेच्या बाबतीत त्याची चुणूक दिसायला आज सुरुवात झाली आहे.
कॉल सेंटरच्या नोकरीतली गरज म्हणून अमेरिकन धाटणीचं इंग्रजी अस्खलित बोलू शकणाऱ्या मुलांना मराठीशी दोन हात करावे लागतात. इथे प्रश्‍न फक्त मराठी बोलण्याचा नसतो. मराठी ही निव्वळ भाषा नाही, ती या समाजाची संस्कृती आहे. भाषा म्हणून मराठी आज चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देत नसेल; पण ती एका समाजाची ओळख आहे, अस्मिता आहे. मराठी म्हणवून घेणाऱ्या माणसाची मुळं थेट ज्ञानेश्‍वर, मुकुंदराजापर्यंत असतात. संतांनी त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक मनाची मशागत केलेली असते. वारी न करताही त्या परंपरेशी तो मनानं जोडला गेलेला असतो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, जेजुरीचा खंडोबा यांच्याबरोबरच शिवाजी महाराज हे त्याचं आराध्यदैवत असतं. गड-किल्ल्यांवरचा मोकळा वारा त्यानं कधी ना कधी तरी अभिमानानं छातीत भरून घेतलेला असतो. ओव्या-अभंगांनी, कीर्तनानं त्याच्या थकल्याभागल्या जीवाची हुरहुर कमी केलेली असते. लावणीबरोबरच शाहिरीत त्याचा जीव रमलेला असतो. पिठलं-भाकरी आणि मिरचीच्या ठेच्याचं नाव काढलं तरी त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. त्याला गनिमी कावा माहीत असतो आणि अमृताते पैजेवर जिंकण्याचा दावा करणाऱ्या त्याच्या भाषेला तितक्‍याच करकरीत शिव्यांचंही वावडं नसतं. ही यादी आणखी कितीतरी वाढत जाऊ शकते.
इंग्रजीतून शिकणारी, पोटापाण्यासाठी जगभर कुठेही जाण्याची शक्‍यता असलेली उद्याची पिढी मराठी भाषेशीच जोडली गेली नसेल, तर ती या परंपरांशी तरी कशी जोडली जाणार? वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर तितक्‍याच वेगानं बदलणाऱ्या जगात व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपली ओळख ठसवायची असेल, तर भाषा, संस्कृती हाच अस्सल आधार ठरतो. म्हणूनच व्यवहाराची गरज म्हणून इंग्रजी शिकवावं लागलं, हिंदी वापरावं लागलं तरी मराठीशी असलेलं पुढच्या पिढीचं जैविक नातं तोडू नका. त्यापेक्षा तिला ट्रायलिंग्वल बनवा!

Friday, January 28, 2011

भाषेवर प्रेम करा, शेजाऱ्यांच्याही!

अ गदी शेजारच्या कर्नाटकात, गुजरातेत किंवा आंध्रात गेलो की आपण शब्दशः अक्षरशत्रू ठरतो. हीच परिस्थिती आपल्या देशातल्या इतर राज्यांमधल्या लोकांचीही असते. पण आपण हे विसरतो की जेव्हा दळणवळणाची कोणतीही आधुनिक साधनं नव्हती, तेव्हाही लोक प्रवास करीत आणि भाषेच्या अडचणीवर मात करीत. कसे?
---

का नडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नये, हे आपण ऐकलेलं असतं. अशीच एक गमतीशीर गोष्टही आहे. कानडी मुलीशी लग्न झाल्यावर मराठी नवरा मजलदरमजल करीत तिच्याबरोबर आपल्या गावी यायला निघतो. वाटेत कुठलं तरी गाव लागतं. ती विचारते, "यल्ली मेली?' म्हणजे कुठलं गाव आलंय हे? त्याला वाटलं, या गावात राहणारी यल्ली नावाची कुणी बहीण-मैत्रीण मरण पावली असं ती सांगतेय. तो हात वर करून म्हणतो, "हरिसत्ता!' तिला वाटतं, हरी हा आपला भाऊ, मरण पावलाय असं तो सांगतोय.
ती रडायला लागते. म्हणून तोही रडायला लागतो.

आपल्या शेजारच्या कर्नाटक, आंध्र, गुजरात या तिन्ही राज्यांच्या बाबतीत आपलीही हीच गत होऊ शकते. आपलीच कशाला? प्रत्येक भारतीय माणसाची हीच परिस्थिती आहे. आपल्याला आपली मातृभाषा, बऱ्या प्रमाणात हिंदी आणि कामचलाऊ का होईना; इंग्लिश येत असलं तरी अगदी आपल्या शेजारच्याच राज्यात गेल्यास आपण पार अक्षरशत्रू होऊन जातो.

याला कारण आहे, दर राज्यागणिक बदलणारी तिथली भाषा. इकडून तिकडे जाणाऱ्यांना ती अडचणीची वाटत असली तरी भाषांची आपल्याकडची ही विविधता तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. जगात कोणत्याही देशाकडे इतकी भाषिक समृद्धी नाही.
आपल्याकडे घटनेने राज्यव्यवहाराची भाषा म्हणून मान्यता दिलेल्या अधिकृत भाषाच 22 आहेत. त्यातल्याही 18 भाषा जवळ जवळ 96 टक्के लोक बोलतात. त्यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, काश्‍मिरी, कन्नड, कोकणी, मल्याळी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, सिंधी, तमीळ, तेलगू, उर्दू या भाषांचा समावेश आहे. त्याशिवाय 1991 च्या जनगणनेनुसार 1576 भाषा या मातृभाषा आहेत.
या सगळ्या भाषांमध्येही हिंदी ही सगळ्यात जास्त लोकांची मातृभाषा आहे. मध्य आणि उत्तर भारत तर हिंदी बेल्ट म्हणूनच ओळखला जातो. त्याशिवाय ती बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तरांचल यांची राज्यभाषा आहे.

अर्थात ही सगळी व्यवस्था म्हणजेच भाषावार प्रांतरचना निर्माण झाली, ती स्वातंत्र्यानंतर. ब्रिटिश येण्यापूर्वी भारत नावाचा देश अस्तित्वात होता. पण भारत नावाचं राष्ट्र अस्तित्वात नव्हतं. लहान लहान राज्यंही एक प्रकारे लहान लहान राजवटीच होत्या. राजवटीनुसार राज्यव्यवस्था वेगळी, भाषा वेगळ्या, संस्कृती वेगळी, ब्रिटिशांनी हे सगळं एकत्र आणून "नेशन- स्टेट'ची उभारणी केली. आज दिसतात त्या वेगवेगळ्या भाषा त्यापूर्वीही होत्या, आपापल्या भाषेपलीकडे दुसरी भाषा न येणारे लोक तीर्थाटनासाठी देशभर फिरत. मग ते या प्रवासात भाषेचे काय करीत?

या प्रश्‍नाचं एक उत्तर कन्नड कादंबरीकार भैरप्पा यांच्या "सार्थ' नावाच्या कादंबरीत सापडतं. ही सहाव्या-सातव्या दशकाच्या पार्श्‍वभूमीवरची कादंबरी आहे. त्यातून असं दिसतं की तीर्थाटनाला जाणारे लोक व्यापाऱ्यांच्या तांड्याबरोबर प्रवास करीत. या व्यापाऱ्यांची स्वतंत्र संरक्षण व्यवस्था असे, त्यांच्याबरोबर दुभाषे असत. मुक्कामाची काही समाईक ठिकाणं असत. तिथं थांबून आपल्याला हव्या त्या दिशेने जाणाऱ्या तांड्याची वाट बघितली जाई. वेगवेगळ्या राज्यांमधून फिरताना येणारा भाषेचा प्रश्‍न सोडविण्याचा हा त्या काळातला मार्ग असू शकतो.

या सगळ्याचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे आज भाषांवरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष. द्रविडी भाषांचा हिंदीवर राग आहे. उरिया भाषेला बंगालीचं अतिक्रमण खुपतं. मराठीला हिंदीवाल्यांना हाकलून द्यायचंय. आसामी लोकांना बिहारीचं वाढतं अतिक्रमण थोपवायचंय. या सगळ्यामागची कारणं बहुतेकदा आर्थिक आहेत. पण त्यांना तोंड देताना इतर भाषांचाही द्वेष करण्याची मानसिकता वाढते आहे. आज आपली विचारसरणी एकवेळ इंग्रजी चालेल; पण या आपल्याच देशातल्या भाषा नकोत अशी होत चालली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये समूहांच्या अस्मिता टोकदार होत जातात. भाषा हे तर अस्मितेचं रोजच्या जीवनात थेट सामोरं येणारं प्रतीक. त्यामुळे भाषेबद्दलची आक्रमकता वाढते आहे. पण आपल्या भाषेवर प्रेम करायचं म्हणजे इतर भाषांचा द्वेष करायचा का?

आज आपण देश रेल्वेमार्गांनी जोडला आहे वगैरे भाषा करतो. पण पूर्वी आधुनिकतेची अशी कोणतीच साधनं नव्हती आणि तरीही आपला देश जोडला गेला होता. तो जोडणारे धागे सांस्कृतिक होते आणि ते न दिसणारे होते. संत नामदेव तीर्थयात्रा करीत पंजाबात गेले आणि तिथे त्यांचे अभंग आजही गायले जातात. हे वाहतुकीची, संवादाची आजच्यासारखी कोणतीही साधनं नसताना घडू शकलं, ते या अदृश्‍य सांस्कृतिक धाग्यांमुळेच. भाषेवरून राजकारण करणारे कधीतरी इतिहास असा समजून घेतील?

तुही मातृभाषा कंची?

आईकडून मिळते ती भाषा म्हणजे मातृभाषा ही मातृभाषेची सहजसोपी व्याख्या; पण गेल्या वीसेक वर्षात मातृभाषेबद्दलचे अनेक प्रश्‍न पुढे आले आहेत.
---
बिरबल बादशहाची एक गोष्ट आहे. बादशहाकडे एक विद्वान येतो. त्याला एकाच वेळी पाच-सात भाषा येत असतात. या सगळ्याच भाषा तो इतक्‍या अस्खलित बोलत असतो, की यातली माझी मातृभाषा कोणती ते ओळखून दाखवा, असं त्याचं आव्हान असतं. त्याला येणाऱ्या सगळ्या भाषा जाणणाऱ्या विद्वानांना बोलावलं जातं. त्याच्या भाषाज्ञानापुढे हे विद्वानही हात टेकतात. आता काय करायचं? दरबारातल्या कुणालाही त्याची मातृभाषा ओळखून दाखवण्याचं आव्हान पेलता आलं नाही, तर बादशहाची नाचक्की होणार. बादशहा अपेक्षेने बिरबलाकडे पाहतो. बिरबल एक युक्ती करतो. एका सेवकाला बोलवून त्या विद्वानाच्या पाठीवर चाबकाचा एक फटका द्यायला सांगतो. तो फटका बसल्याक्षणी तो विद्वान ओरडतो. हीच याची मातृभाषा, बिरबल सांगतो.
000000
आपल्या देशासारख्या सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर वैविध्य आणि तितकीच गुंतागुंत असलेल्या देशात तर मातृभाषा हा प्रश्‍न आणखीनच गुंतागुंतीचा आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे एकेकाळचे माध्यम सल्लागार शारदा प्रसाद यांनी 2001 मध्ये झालेल्या जनगणनेसंदर्भात एक लेख लिहिला होता. त्या लेखात ते म्हणतात, माझी मातृभाषा कन्नड, माझ्या पत्नीची मातृभाषा तेलुगु, आमची मुलं वाढली दिल्लीत, शिकली तिथल्याच आसपासच्या शाळांमध्ये. हिंदी आणि इंग्लिश याच भाषा त्यांच्या कानावर पडल्या. शिकवल्या गेल्या. त्यांच्या शालेय शिक्षणात त्यांचा कुठेही आमच्या म्हणजे आई-वडिलांच्या मातृभाषेचा संबंध आला नाही. त्यामुळे जनगणनेत मातृभाषा कोणती, हा प्रश्‍न आला तेव्हा मुलांची मातृभाषा हिंदी अशीच नोंदवली गेली.
त्यांच्या मुलांची मातृभाषा खरोखरच हिंदी असू शकते का?
000
मातृभाषा म्हणजे काय, या प्रश्‍नाचं ढोबळमानाने उत्तर आई बोलते ती भाषा. ते जास्त व्यापक केलं तर आई-वडिलांची म्हणजेच त्या घरात बोलली जाते, ती भाषा असं म्हणता येईल. एकेकाळी आपल्याकडे लोकांची मोबिलिटी कमी होती. नोकरीव्यवसायानिमित्ताने या राज्यातून त्या राज्यात जाऊन स्थिरस्थावर होण्याचं प्रमाण तुलनेत कमी होतं. गेल्या वीस वर्षांत हे प्रमाण विशेषतः आयटीवाल्यांमुळे प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. वेगवेगळ्या दोन राज्यांतले तरुण-तरुणी तिसऱ्याच राज्यात भेटतात, लग्न करतात, तिथेच स्थायिक होतात. त्यांच्या घरात त्या राज्यातली भाषा बोलली जात नसते, त्या दोघांनाही एकमेकांची मूळ भाषा येत नसते. परिणामी घरात सामाईक भाषा हिंदी किंवा इंग्रजी बोलली जाते. तीच त्यांच्या मुलांचीही भाषा बनते; पण ती त्यांची मातृभाषा म्हणायची का?
000
मातृभाषा या संकल्पनेचं सांख्यिक महत्त्व आपल्याकडे लक्षात आलं ते जनगणनेमुळे. 1961 साली झालेल्या जनगणनेत मातृभाषेसंदर्भातले प्रश्‍न विचारले गेले. ही जनगणना करताना ती करणाऱ्या प्रगणकांना लोक मातृभाषेबाबत सांगतील ती माहिती तशीच उतरवून घ्यायला सांगितलं गेलं होतं. त्या माहितीवर प्रगणकांनी आपल्या ज्ञानानुसार कोणतेही संस्कार करायचे नव्हते. गंमत म्हणजे लोकांनी जात, धर्म, व्यवसाय, गाव यांची नावं मातृभाषा म्हणून सांगितली. या जनगणनेत मिळालेल्या माहितीचं संकलन, विश्‍लेषण केलं गेलं. त्यातून असं पुढे आलं की आपल्या देशात 1652 मातृभाषा बोलल्या जातात. या सगळ्याच भाषांना लिपी आहे, असं नाही. त्याशिवाय जवळपास 400 भाषा बोलल्या जातात. या सगळ्या भाषांचं इंडो आर्यन, द्राविडीयन, ऑस्ट्रिक, तिबेटो-बर्मन या चार प्रमुख भाषाकुलांमध्ये वर्गीकरण केलं गेलं आहे.
000
2001 च्या जनगणनेमध्ये लोकांना मातृभाषेचं नाव आणि येत असलेल्या इतर भाषांची नावं हे नवे प्रश्‍न विचारले गेले. या जनगणनेमध्ये मातृभाषेची व्याख्या लहानपणी त्या व्यक्तीची आई तिच्याशी ज्या भाषेत बोलली असेल ती भाषा, असं करण्यात आलं आहे. त्या व्यक्तीची आई लहानपणीच मरण पावली असेल तर कुटुंबात बोलली जाणारी भाषा ही त्या व्यक्तीची मातृभाषा मानली गेली आहे. बोलू न शकणारी, तान्ही मुलं, मतिमंद तसंच मुक्‍या बहिऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही तिच्या आईची भाषा ही तिची भाषा मानली गेली आहे. कुटुंबात आई-वडिलांची भाषा वेगवेगळी असेल, तर त्या दोन्ही भाषा मातृभाषा म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत.
000
म्हणूनच मातृभाषेबद्दल आजच्या काळात अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. उदाहरणार्थ, आई-वडील मराठी आहेत आणि ते मुलांशी इंग्रजीतच बोलतात तर त्या मुलाची भाषा कोणती धरायची? आईची मातृभाषा अहिराणी आणि वडिलांची कोकणी असेल, ते मुलांशी कधी अहिराणीत कधी कोकणीत तर कधी प्रमाण मराठीत बोलत असतील तर मुलांची मातृभाषा कोणती? आईची भाषा बंगाली, वडिलांची उरिया आणि त्यांनी मुलांना त्या दोन्ही भाषा शिकवल्या आहेत, तर त्या मुलांची मातृभाषा कोणती? एका व्यक्तीच्या दोन दोन मातृभाषा असू शकतात का? आई-वडिलांची दोघांचीही मातृभाषा तेलुगु, ते दोघंही मुंबईत वाढल्यामुळे त्यांना तेलुगु येत नसेल तर त्यांची मुलं आपली मातृभाषा तेलुगु असल्याचा दावा करू शकतील का? वेगवेगळ्या राज्यांमधली मुस्लिम कुटुंबं आपली मातृभाषा उर्दू असल्याचं सांगत असतील तर? जात, धर्म, व्यवसाय, प्रदेश यावरून मातृभाषा ठरवता येते का?