Friday, January 28, 2011

भाषेवर प्रेम करा, शेजाऱ्यांच्याही!

अ गदी शेजारच्या कर्नाटकात, गुजरातेत किंवा आंध्रात गेलो की आपण शब्दशः अक्षरशत्रू ठरतो. हीच परिस्थिती आपल्या देशातल्या इतर राज्यांमधल्या लोकांचीही असते. पण आपण हे विसरतो की जेव्हा दळणवळणाची कोणतीही आधुनिक साधनं नव्हती, तेव्हाही लोक प्रवास करीत आणि भाषेच्या अडचणीवर मात करीत. कसे?
---

का नडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नये, हे आपण ऐकलेलं असतं. अशीच एक गमतीशीर गोष्टही आहे. कानडी मुलीशी लग्न झाल्यावर मराठी नवरा मजलदरमजल करीत तिच्याबरोबर आपल्या गावी यायला निघतो. वाटेत कुठलं तरी गाव लागतं. ती विचारते, "यल्ली मेली?' म्हणजे कुठलं गाव आलंय हे? त्याला वाटलं, या गावात राहणारी यल्ली नावाची कुणी बहीण-मैत्रीण मरण पावली असं ती सांगतेय. तो हात वर करून म्हणतो, "हरिसत्ता!' तिला वाटतं, हरी हा आपला भाऊ, मरण पावलाय असं तो सांगतोय.
ती रडायला लागते. म्हणून तोही रडायला लागतो.

आपल्या शेजारच्या कर्नाटक, आंध्र, गुजरात या तिन्ही राज्यांच्या बाबतीत आपलीही हीच गत होऊ शकते. आपलीच कशाला? प्रत्येक भारतीय माणसाची हीच परिस्थिती आहे. आपल्याला आपली मातृभाषा, बऱ्या प्रमाणात हिंदी आणि कामचलाऊ का होईना; इंग्लिश येत असलं तरी अगदी आपल्या शेजारच्याच राज्यात गेल्यास आपण पार अक्षरशत्रू होऊन जातो.

याला कारण आहे, दर राज्यागणिक बदलणारी तिथली भाषा. इकडून तिकडे जाणाऱ्यांना ती अडचणीची वाटत असली तरी भाषांची आपल्याकडची ही विविधता तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. जगात कोणत्याही देशाकडे इतकी भाषिक समृद्धी नाही.
आपल्याकडे घटनेने राज्यव्यवहाराची भाषा म्हणून मान्यता दिलेल्या अधिकृत भाषाच 22 आहेत. त्यातल्याही 18 भाषा जवळ जवळ 96 टक्के लोक बोलतात. त्यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, काश्‍मिरी, कन्नड, कोकणी, मल्याळी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, सिंधी, तमीळ, तेलगू, उर्दू या भाषांचा समावेश आहे. त्याशिवाय 1991 च्या जनगणनेनुसार 1576 भाषा या मातृभाषा आहेत.
या सगळ्या भाषांमध्येही हिंदी ही सगळ्यात जास्त लोकांची मातृभाषा आहे. मध्य आणि उत्तर भारत तर हिंदी बेल्ट म्हणूनच ओळखला जातो. त्याशिवाय ती बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तरांचल यांची राज्यभाषा आहे.

अर्थात ही सगळी व्यवस्था म्हणजेच भाषावार प्रांतरचना निर्माण झाली, ती स्वातंत्र्यानंतर. ब्रिटिश येण्यापूर्वी भारत नावाचा देश अस्तित्वात होता. पण भारत नावाचं राष्ट्र अस्तित्वात नव्हतं. लहान लहान राज्यंही एक प्रकारे लहान लहान राजवटीच होत्या. राजवटीनुसार राज्यव्यवस्था वेगळी, भाषा वेगळ्या, संस्कृती वेगळी, ब्रिटिशांनी हे सगळं एकत्र आणून "नेशन- स्टेट'ची उभारणी केली. आज दिसतात त्या वेगवेगळ्या भाषा त्यापूर्वीही होत्या, आपापल्या भाषेपलीकडे दुसरी भाषा न येणारे लोक तीर्थाटनासाठी देशभर फिरत. मग ते या प्रवासात भाषेचे काय करीत?

या प्रश्‍नाचं एक उत्तर कन्नड कादंबरीकार भैरप्पा यांच्या "सार्थ' नावाच्या कादंबरीत सापडतं. ही सहाव्या-सातव्या दशकाच्या पार्श्‍वभूमीवरची कादंबरी आहे. त्यातून असं दिसतं की तीर्थाटनाला जाणारे लोक व्यापाऱ्यांच्या तांड्याबरोबर प्रवास करीत. या व्यापाऱ्यांची स्वतंत्र संरक्षण व्यवस्था असे, त्यांच्याबरोबर दुभाषे असत. मुक्कामाची काही समाईक ठिकाणं असत. तिथं थांबून आपल्याला हव्या त्या दिशेने जाणाऱ्या तांड्याची वाट बघितली जाई. वेगवेगळ्या राज्यांमधून फिरताना येणारा भाषेचा प्रश्‍न सोडविण्याचा हा त्या काळातला मार्ग असू शकतो.

या सगळ्याचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे आज भाषांवरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष. द्रविडी भाषांचा हिंदीवर राग आहे. उरिया भाषेला बंगालीचं अतिक्रमण खुपतं. मराठीला हिंदीवाल्यांना हाकलून द्यायचंय. आसामी लोकांना बिहारीचं वाढतं अतिक्रमण थोपवायचंय. या सगळ्यामागची कारणं बहुतेकदा आर्थिक आहेत. पण त्यांना तोंड देताना इतर भाषांचाही द्वेष करण्याची मानसिकता वाढते आहे. आज आपली विचारसरणी एकवेळ इंग्रजी चालेल; पण या आपल्याच देशातल्या भाषा नकोत अशी होत चालली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये समूहांच्या अस्मिता टोकदार होत जातात. भाषा हे तर अस्मितेचं रोजच्या जीवनात थेट सामोरं येणारं प्रतीक. त्यामुळे भाषेबद्दलची आक्रमकता वाढते आहे. पण आपल्या भाषेवर प्रेम करायचं म्हणजे इतर भाषांचा द्वेष करायचा का?

आज आपण देश रेल्वेमार्गांनी जोडला आहे वगैरे भाषा करतो. पण पूर्वी आधुनिकतेची अशी कोणतीच साधनं नव्हती आणि तरीही आपला देश जोडला गेला होता. तो जोडणारे धागे सांस्कृतिक होते आणि ते न दिसणारे होते. संत नामदेव तीर्थयात्रा करीत पंजाबात गेले आणि तिथे त्यांचे अभंग आजही गायले जातात. हे वाहतुकीची, संवादाची आजच्यासारखी कोणतीही साधनं नसताना घडू शकलं, ते या अदृश्‍य सांस्कृतिक धाग्यांमुळेच. भाषेवरून राजकारण करणारे कधीतरी इतिहास असा समजून घेतील?

No comments:

Post a Comment