Thursday, January 7, 2010

थ्री इडियट्‌स' आणि शहाणा लेखक

चेतन भगतच्या बाबतीत "आम के आम, गुठलियोंके भी दाम' ही म्हण सध्या अगदी फिट्ट बसणारी आहे. प्रसिद्ध झालेल्या तीनही पुस्तकांना तरुणांच्या पातळीवरून देशभर प्रचंड लोकप्रियता, डोळे फिरविणारे खपाचे आकडे, हे कमी म्हणून की काय त्यावरून बॉलीवूडमध्ये आमीर खानसारख्या कलाकाराला घेऊन निघणारा सिनेमा, विधू विनोद चोप्रासारखा निर्माता, राजकुमार हिरानीसारखा दिग्दर्शक, "थ्री इडियट्‌स'लाही प्रेक्षकांचा तुफानी प्रतिसाद आणि हे सगळं कमी आहे म्हणून की काय बॉलीवूडमध्ये नेहमीच पथ्यावर पडणारी कॉन्ट्रोव्हर्सी."थ्री इडियट्‌स'च्या श्रेयनामावलीत चेतन भगतच्या बाबतीत नेमकं काय झालं, ते जसजसं पुढे येत गेलं तसतशी सगळी सहानुभूती चेतनला मिळत जाणं अगदी साहजिक होतं. गेली चार-पाच वर्ष सतत चर्चेत असलेला हा भारतातल्या तरुणांचा आवडता, बेस्ट सेलर तरुण लेखक. आयआयटी दिल्ली आणि आयआयएमचा पदवीधर. आंतरराष्ट्रीय पातळीवरची बॅंकिंगच्या क्षेत्रातली नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक बनायचं त्यानं ठरवलं आणि "फाइव्ह पॉइंट समवन, व्हॉट नॉट टू डू ऍट आयआयटी' ही त्याची पहिली कादंबरी आली. काहीशी आत्मचरित्रात्मक. वेगवगेळ्या पार्श्‍वभूमीतून आयआयटीत गेलेली तीन पोरं एकमेकांचे मित्र बनतात आणि आपल्या तिथल्या शिकण्याच्या काळात काय करतात त्याचं वर्णन करणारी ही धमाल कादंबरी तरुणांनी उचलून धरली नसती तरच आश्‍चर्य होतं. शिकण्यासाठी जिथं समाजातलं बुद्धिमत्तेचं "क्रीम' जमा होतं, असं आयआयटीसारखं ठिकाण असलं म्हणून काय झालं, तिथंही कॉलेज लाईफच्या बाबतीत इतर कॉलेजांपेक्षा फार वेगळं काही चालत नाही, हे अधोरेखित करीत "फाईव्ह पॉइंट'नं आयआयटीचं दारच जगाला उघडून दिलं. पुस्तक तुफान खपलं. पहिल्या पुस्तकानंच चेतनला तरुणांचा आयकॉन बनवलं. तो झपाटा ओसरायच्या आतच "वन नाईट ऍट कॉल सेंटर' आलं. प्रवासात लेखकाला एक तरुणी भेटते. वेळ घालविण्यासाठी दोघं गप्पा मारत असतात. ती त्याला एक गोष्ट सांगायला लागते. त्याआधी तिची अट असते, की त्या गोष्टीवर त्यानं आपलं दुसरं पुस्तक लिहिलं पाहिजे. त्याला ही अट थोडी खटकते; पण तरीही जातिवंत लेखकाप्रमाणे तो तिची गोष्ट ऐकायचं कबूल करतो. एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सहा जणांची गोष्ट ती सांगायला लागते. त्यांना त्या कॉल सेंटरमध्ये काम करीत असताना एका रात्री एक फोन येतो. थेट देवाकडून. त्याची गोष्ट म्हणजे वन नाईट ऍट कॉल सेंटर. आजच्या तरुणांची भाषा बोलणारं, त्यांच्या विश्‍वाबद्दल सांगणारं हे पुस्तकही तरुणांनी डोक्‍यावर घेतलं."द थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाईफ' हे चौथं पुस्तक चेतननं लिहिलं. अहमदाबादमध्ये गोविंद नावाचा तरुण आपल्या दोन मित्रांसह खेळाचं साहित्य विकणारं दुकान सुरू करतो. त्यांना पैसे मिळवायचे असतात. यशस्वी व्हायचं असतं; पण ते काही सहजसोपं नसतं. भूकंप होतो, गुजरात दंगल होते, प्रेम प्रकरण आडवं येतं. मित्रांमध्ये समज - गैरसमज होतात. या सगळ्याचा खोलवर परिणाम होत त्यांच्या स्वप्नाचा प्रवास सुरू राहतो. त्याची गोष्ट म्हणजे "द थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाईफ'. "टू स्टेटस- द स्टोरी ऑफ माय मॅरेज' हे चेतनचं चौथं पुस्तक आहे. पहिल्या पुस्तकाप्रमाणेच तेही आत्मचरित्रात्मक आहे. धर्म, जात, वंश, राज्य, भाषा अशा सगळ्या गोष्टींत विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशात लव्ह मॅरेज करताना मुलगा-मुलगी एकमेकांना आवडले एवढंच पुरेसं नसतं. दोघांच्या घरातल्या लोकांनाही ते आवडावे लागतात. क्रिश आणि अनन्या यांच्या घरांतूनही विरोध असतो. तरीही ते लग्न करतात आणि सगळ्या संघर्षाला कसे तोंड देतात, त्याची धमाल या पुस्तकात आहे. चेतनच्या या पुस्तकालाही तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्याला "थ्री इडियट्‌स'मुळे निर्माण झालेल्या वादंगाचीही पार्श्‍वभूमी आहे. त्याच्या "वन नाईट ऍट कॉल सेंटर' या कादंबरीवरून हॅलो नावाचा सिनेमा आला होता. त्या सिनेमाचं स्क्रिप्टही चेतननंच लिहिलं होतं. तो सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी झाला नाही; पण "फाईव्ह पॉइंट समवन'वरचा "थ्री इडियट्‌स' मात्र निर्मिती प्रक्रियेपासूनच चर्चेत होता. आता निर्मात्या, दिग्दर्शकाबरोबरच्या वादंगाची फोडणी त्याला मिळाली आहे. त्याचा सगळ्यात जास्त फायदा अर्थातच चेतनलाच होतो आहे. कारण- एक तर तो तरुणांचा आयकॉन ठरलेला, गेली काही वर्षे चर्चेत असलेला लेखक आहे. भारतातला आजवरचा सर्वाधिक खपाचा इंग्रजी कादंबरीकार असं "न्यूयॉर्क टाइम्स'नं त्याचं वर्णन केलं आहे. यावरून चेतनच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. "फाइव्ह पॉईंट समवन'वरून प्रेरणा घेऊन एखादा सिनेमा काढला जात असेल, तर लेखकाचं जे असेल ते श्रेय त्याला द्यायलाचं हवं, असंच जनमत आहे. चेतननं या विषयावर त्याच्या ब्लॉगवर लिहिलेल्या लेखांना ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यावरून हाच सूर आहे. ैया सगळ्याबद्दल चेतन त्याच्या ब्लॉगवर लिहितो, थ्री इडियट्‌स हा सिनेमा कादंबरीवर आधारित आहे, असं म्हटलं जातं तेव्हा तो सिनेमा कादंबरीपासून वेगळा कसा होऊ शकतो? राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी दोघांनीही सिनेमाची पटकथा लिहिली आहे; पण, सिनेमाची स्टोरी मूळ त्यांची नाही हे ते का लपवून ठेवत आहेत? त्यांनी माझ्या स्टोरीवर आधारित सिनेमा बनवला आहे; नवीन स्टोरी तयार केलेली नाही. मग त्यांनी माझं श्रेय का नाकारावं? माझं म्हणणं इतकंच आहे, की लेखकाच्या श्रेयनामावलीत माझंही नाव द्या.चेतनचे मुद्दे कुणालाही पटतील असेच आहेत. कादंबरीचे हक्क विकले, तसं कॉन्ट्रॅक्‍ट केलेलं असलं तरी लेखकाला त्याचं श्रेय मिळायलाच हवं. चेतनसाठी जमेची बाजू म्हणजे आज सगळी तरुणाई त्याच्या बाजूनं आहे. नैतिक लढाई त्यानं जिंकल्यातच जमा आहे.हा सगळा वादविवाद बाजूला ठेवला आणि निव्वळ लेखक म्हणून चेतन भगत कसा आहे? चेतन वर्तमानकाळाचा लेखक आहे. तो आजच्या, आत्ताच्या विषयांना भिडतो. तो तरुण असल्यानं त्याचे विषयही तरुणांचे असतात. त्यामुळे कॉलेजजीवन, कॉल सेंटर, बिझनेस करणं आणि त्या सगळ्यातून येणारे अनुभव तो मांडतो. त्याच्या लिखाणात एक प्रकारचा सच्चेपणा आहे. त्याची पात्रं याच मातीतून जन्मलेली, इथलीच असतात. साधी सोपी, प्रवाही इंग्रजी ही तर त्याची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. त्याची भाषा गोष्टीवेल्हाळ, वर्णनात्मक आहे. माणसाबद्दलचं अपार कुतूहल, जगण्यातल्या विसंगतीतून निर्माण होणारा विनोद आणि चेतन त्यातून टिपतो ते कारुण्य यामुळे त्याच्या कादंबऱ्या वेगळ्या ठरतात. लेखकाकडे असावी लागते ती करुणा चेतनकडे नक्कीच आहे. मनोरंजन हे आपल्या कादंबरीलिखाणाचं महत्त्वाचं मूल्य आहे हे त्यालाही मान्य आहे. पुस्तक, सिनेमा हे मनोरंजनासाठी असतात. मला जे गंभीरपणे सांगायचं असतं, त्यासाठी मी स्तंभलेखन करतो, असंही तो सांगतो. (चेतनबाबत काही गमतीशीर निरीक्षणंही आहेत. त्याच्या एका तरी पात्राचं नाव श्रीकृष्णाशी संबंधित म्हणजे गोविंद, हरी, श्‍याम असतं. त्याच्या प्रत्येक कादंबरीच्या नावात एक तरी अंक असतो. उदा. फाइव्ह पॉईंट समवन, वन नाईट ऍट कॉल सेंटर, थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाईफ इत्यादी. त्याबद्दल चेतन म्हणतो. शेवटी मी एक बॅंकर आहे. आकडे माझ्या डोक्‍यातून जातच नाहीत. असो!)वेबसाईट, ब्लॉग, ट्‌विटर अशा आजच्या काळातल्या संपर्कमाध्यमांचा तो पुरेपूर वापर करतो. ट्‌विटरवर तर चेतनचे 27,000 फॉलोअर्स आहेत. पायरेटेड पुस्तकं घ्यावीत की नाही या मुद्द्यावरून अलीकडेच त्याचा ट्‌विटरवर त्याच्या दोन वाचकांशी घनघोर वाद झाला. चेतननं चिडून त्यांचे ट्‌विट्‌स ब्लॉक करण्यापर्यंत मजल गेली होती. चेतन भगतच्या लिखाणाला नाकं मुरडणारे, त्याला निव्वळ "पॉप्युलर' लेखकांच्या पंक्तीत बसविणारेही आहेत; पण पहिल्याच पुस्तकानं तरुणांचा आयकॉन बनलेला चेतन आता या सगळ्यांच्या पलीकडे पोचला आहे.

No comments:

Post a Comment