Thursday, May 20, 2010

न्यायाचा सरकारी चेहरा

न्यायाचा सरकारी चेहरा
मुंबई हल्ल्यावरच्या निकालपत्राच्या वाचनाचं सोमवारचं कामकाज संपलं तेव्हा प्रसारमाध्यमांनी सगळ्यात पहिला गराडा घातला तो विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना. कसाबखालोखाल तो दिवस जणू काही उज्ज्वल निकम यांचाच होता. त्यांच्या मुलाखती, त्यांचे बाईट, असं सगळं सकाळपासूनच सुरू होतं. त्यामुळेच निकालपत्राच्या पहिल्या दिवसाच्या वाचनानंतरही सगळ्यात महत्त्वाची होती ती त्यांची प्रतिक्रिया. "येस यू आर गिल्टी' हा कसाबवरचा अहवाल दाखवत तेही ती हिरिरीने देत होते. 1994 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यापासूनचा उज्ज्वल निकम यांचा प्रवास कुणालाही थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म जळगावचा. वडील देवराव निकमही वकील. त्यामुळे व्यवसायाचं बाळकडूच मिळालेलं. सायन्सची आणि नंतर लॉच्या पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी जळगावातच पूर्ण केलं. काही काळ तिथल्याच सत्र न्यायालयात सरकारी वकील म्हणून कामही केलं. पण मुंबईचे माजी सहआयुक्त एम. एन सिंग यांनी त्यांना मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात जळगावहून बोलावलं. त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि बघता बघता ते या बिनचेहऱ्याच्या यंत्रणेचा चेहरा बनून गेले. तेरा बॉम्बस्फोटांच्या मालिकेवरचा 14 वर्षे चाललेला हा खटला आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता, असं ते सांगतात. हा प्रदीर्घ, संवेदनशील खटला हाताळल्यानंतर उज्ज्वल निकम यांच्याकडे गुलशनकुमार खून खटला, नदीम खटला, खैरलांजी हत्याकांड, प्रमोद महाजन खून खटला असे अनेक महत्तवाचे खटले येत गेले. आणि त्या सगळ्यामधून त्यांची कारकीर्द झळाळत राहिली. तीस वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांच्या युक्तिवादामुळे आत्तापर्यंत 613 जणांना जन्मठेप तर 33 जणांना फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे. या सगळ्या हाय प्रोफाईल खटल्यांचे वकील असल्यामुळ
े उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. आपल्या सगळ्या यशामध्ये कोणतीही तक्रार न करता आपल्याबरोबर दिवसरात्र फिरणाऱ्या या सुरक्षा रक्षकांचाही वाटा आहे असं त्यांना वाटतं. या सगळ्या तीस वर्षांच्या प्रवासात त्यांना निशब्द साथ दिली आहे ती त्यांच्या कुटुंबाने. सततचा प्रवास, वेगवेगळ्या मोठमोठ्या खटल्यांची धावपळ या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ते जमेल तेवढा वेळ कुटुंबासाठी काढायचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या दगदगीत कुटुंबानंही आपल्याला समजून घेतलंय, हे ते आवर्जुन सांगतात. त्यांचं दिनक्रम बघतला तरी त्यांच्या रोजच्या दगदगीची कल्पना येते. ते रोज सकाळी चार वाजता उठतात. रोज नियमित व्यायाम करतात. सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या खटल्यांचा अभ्यास, पोलीस अधिकाऱ्यांना ब्रिफिंग, नोट्‌स काढणं, केसची तयारी हे सगलं चालतं. अकरा ते पाच कोर्ट, पाच ते सात पेपर वाचणं, बातम्या बघणं, इतर गोष्टी समजून घेणं आणि रात्री साडेदहाला झोप. ते रात्रीच्या पार्ट्यांना जात नाहीत. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या पहिल्या दिवशी ते कोर्टात गेले तेव्हा विशेष टाडा न्यायालयात शंभराच्या वर पत्रकार त्यांची वाट पहात होते. मला तेव्हा भारताचा पंतप्रधान झाल्यासारखंच वाटलं, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, असं ते सांगतात.
कसाबचा खटला देशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्याला ताबडतोब फासावर लटकवा असा लोकांचा आक्रोश सुरू झाला होता. पण हा आंतरराष्ट्रीय खटला होता. तो नीट चालवून आपल्या देशात इतर काही देशांसारखं मध्ययुगीन वातावरण नाही, इथे एक नीट न्याययंत्रणा आहे, हे जगापुढे मांडणं आवश्‍यक होतं. त्याचं शिवधनुष्य निकम यांना पेलायचं होतं. हे अक्षरश शिवधनुष्य होतं. सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेला, मोठा खटला होता तो. त्याचं चार्जशीटच अकरा हजार पानांचं होतं. 650 साक्षीदारांचे जबाब नोंदवून घ्यायचे होते. कसाबवर देशाविरूध्द युध्द पुकारण्यापासूनचे एकूण 86 आरोप होते.
असा सगळा खटला उज्ज्वल निकम यांना हाताळायचा होता. तो त्यांनी कसा हाताळला याचं फलित म्हणजे कसाबला झालेली फाशीची शिक्षा.
कसाबला फाशी का दिली पाहिजे याचा युक्तिवाद करताना त्यांनी आठ कारणं दिली आहेत. कसाब हे पाकिस्तानात तयार झालेले किलिंग मशीन असून त्याला अजिबात जिवंत रहाण्याचा अधिकार नाही. असं सांगून ते न्यायाधीशांना म्हणाले की कसाबची केस ही दुर्मिळातली दुर्मिळ केस आहे. या सैतानाच्या एजंटला फाशीच दिली पाहिजे. एक तर त्याचं सगळं कृत्य पूर्वनियोजित, पूर्वप्रशिक्षित होतं. तरूण, वृध्द, हिंदू, मुस्लिम, ज्यू, ख्रिश्‍चन असा कोणताही विचार न करता त्याने सरसकट सगळ्यांनाच ठार केलं आहे. त्यानं कोणतीही दयामाया न दाखवता अत्यंत योजनाबद्ध रीतीने लोकांना मारलं आहे, हे त्याला फाशी देण्याचं दुसरं कारणं. ते अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात कसाबनं आणि अबू इस्माईलनं आठ स्त्रिया, सात लहान मुलं तसंच 14 पोलिसांसह 72 लोकांना ठार केलं. हे सगळे लोक असहाय होते. ते कोणताही प्रतिकार करू शकत नव्हते. आणि कसाबनं त्यांना मारावं असं कोणतंही कृत्य त्यांनी केलेलं नव्हतं.
कसाबला फाशी दिलीच पाहिजे याचं समर्थन करताना त्यांनी मांडलेला आणखी तिसरा मुद्दा म्हणजे कसाबने फक्त माणसांना जीवे मारलं नाही तर माणसे मारणं एन्जॉय केलं. यातून त्याचा माणसांच्या जगण्याकडे बघण्याचा तुच्छतावादी दृष्टिकोन दिसून येतो. कसाबला फाशीच दिली पाहिजे हे ठासून मांडताना त्यांनी मांडलेला चौथा मुद्दा म्हणजे सीएसटी स्टेशनवर अपेक्षेपेक्षा कमी गर्दी बघून कसाबला जास्त माणसं मारता येणार नाही याचं वाईट वाटलं. त्यामुळे कसाब हा जनावरांपेक्षाही घातक आहे. कसाबच्या कबुलीजबाबाचा संदर्भ देऊन ते म्हणतात की समुद्रमार्गे प्रवास करून मुंबईत पोहोचायला या सगळ्या दहशतवाद्यांना एक तास उशीर झाला. त्यामुळे त्यांना त्या संध्याकाळी सीएसटी स्टेशनवर अपेक्षित गर्दी मिळाली नाही. कसाब आणि इस्माईलनं कुबेर या त्यांनीच पळवलेल्या बोटीच्या खलाशाची हत्या केली. त्याची हत्या ही अकारण केलेली अत्यंत क्रूर हत्या आहे. कसाब म्हणजेच कसाई, खाटिक. आणि या कसाबनं नावाप्रमाणेच कृत्य केलं.
कसाबला फाशी दिलीच पाहिजे यासंदर्भातल्या पाचव्या मुद्‌द्‌याचं समर्थन करताना त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली की कसाबच्या चेहऱ्यावर जाऊ नका. माणसांना मारून सीएसटी स्टेशनवर फिरतानाचे त्याचे फोटोच त्यांनी कोर्टापुढे सादर केले. कसाब मुंबईत आला तो दहा जणांच्या गटाबरोबर. त्या सगळ्यांनी मिळून कोणतंही कारण नसताना 160 निष्पाप लोकांची हत्या केली. अनेकांना जखमी केलं. हे सगळं म्हणजे केवळ घडून आलेली हत्या नाही तर थंड डोक्‍याने जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. या कृत्यामुळे समाजमनाला हादरा बसला. इतक्‍या माणसांच्या हत्येमुळेच केवळ हा दुर्मिळातला दुर्मिळ खटला आहे असं नाही तर ज्या पध्दतीने माणसांना मारण्यात आलं, त्यातलं क्रौर्य पाहता कसाबला फाशीच दिली पाहिजे. कसाबला जर फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली तर भारत हा अतिरेक्‍यांचे "सॉफ्ट टार्गेट' बनेल. त्यामुळे कोणतीही दयामाया न दाखवता कसाबला फाशीच दिली पाहिजे. जो दुसऱ्यांचे जीव घेतो त्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही.
हा उज्ज्वल निकम यांचा कसाबला फाशी देण्यासाठीचा युक्तिवाद होता.
सगळ्या जगाचं लक्ष लागलेल्या या खटल्याचं शिवधनुष्य लीलया पेलत उज्ज्वल निकम यांनी मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशीच्या तख्ता पर्यंत नेऊन पोहोचवलं आहे.

No comments:

Post a Comment